उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुरुवारी एकनाथ शिंदे मुंबईत परतले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेताच काल महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर आज फक्त एकनाथ शिंदेंचाच शपथविधी पार पडणार, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही तासांमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अनेकांनी नव्या सरकारचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी काल अचानक देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या संबंधी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत त्यांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर आपल्या ट्विट मध्ये लिहितात, बिचारे देवेंद्र फडणवीस यांचा केंद्रातील नेतृत्वाने शंकरराव चव्हाण केला ! बिचारे देवेंद्र फडणवीस’ म्हणत आंबेडकरांनी खोचक ट्वीट केले आहे. एकेकाळी मुख्यमंत्री म्हणून काम करणारे शंकरराव चव्हाण नंतर शरद पवार मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या काळात मंत्री म्हणून काम करत होते. देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री असताना आता ते शिंदे यांच्या सरकारात उप मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार असल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी शन्कर चव्हाण यांचा संदर्भ देत देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केली आहे.
काल शरद पवार यांनी ”देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता” अशी प्रतिक्रिया प्रसार माध्यमांना दिली आहे.