पुण्याचा विकास होणार वेगात, उडत्या बसेसची योजना जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin gadkari) पुण्यातील (pune) वाहतूकीचा प्रश्न (traffic) सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला.

पुण्याचा विकास होणार वेगात, उडत्या बसेसची योजना जाहीर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin gadkari) पुण्यातील (pune) वाहतूकीचा प्रश्न (traffic) सोडवण्यासाठी बैठक बोलवली होती. पुणे विभागातील रस्ते विकास योजनांचा आढावा घेतला. त्यात पुणेशहरातून अनेक शहरात जाणाऱ्या मार्गात कोणते बदल केले जाणार हे स्पष्ट केलं, टाउन प्लॅनींगनुसार या सगळ्या मार्गाची रचना होणार आहे.

पुण्यातील चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली वरीष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक पार पडली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांनी काही महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती दिली, यावेळी चाकण एमआयडीसी पासून २७ किमी अंतरावर असलेल्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. पुणे शहराभोवती होणारा अभिर्भाव लक्षात घेता चाकण एमआयडीसीपासून २७ किमी अंतरावर असणाऱ्या पावलेवाडी येथे १८० हेक्टरममध्ये हे लॉजेस्टिक पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी एमआयडीसीसोबत सामंजस्याचा करार देखील झाला आहे. हा प्रकल्प संयुक्तपणे राबवत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुणे विभागात लॉजिस्टिक पार्कसाठी जी जमीन अधिग्रहण करावे लागते. त्यासाठी NHAI तर्फे मी जिल्हाधिकाऱ्यांना एक ऑफर दिली आहे. त्यानुसार ठिकठिकाणी NHAI च्या बाजूला लॉजिस्टिक पार्कसाठी जर जागा दिल्यास मदत होणार आहे. केंद्रातर्फे दोन लाख कोटींच्या लॉजिस्टिक पार्कची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे पुण्याजवळ अशा प्रकारची जागा मिळाल्यास ती या प्रकल्पांसाठी फायदेशीर ठरले असे गडकरींनी यावेळी सांगितले.

ट्रॅफिकची समस्या हा सध्या प्रत्येक मोठ्या शहरातला गंभीर प्रश्न ठरला आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना पुण्याच्या ट्रॅफिकच्या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी भन्नाट उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली, तर पुण्यातल्या ट्रॅफिकची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं गडकरी म्हणाले आहेत. चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडकरींनी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी उडत्या बसेसचा उल्लेख केला. तसेच पुढे ते म्हणाले “आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून ट्रॅफिक गेलं, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केले.

पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्रॅफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्गाबाबत माहिती दिली. “पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारं ट्रॅफिक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असं गडकरी म्हणाले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाली की, नाशिक फाटा येथे दोन मजली सहा पदरी रस्ता आणि तिसऱ्या मजल्यावर मेट्रो असा तीन मजली उड्डाण पूल करण्यासाठी विचार चालू आहे. पुणे विभागातील जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी प्रशासनाने आणि मनपा अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी असं ते म्हणाले आहेत. याबरोबर पुणे ते शिरूर आणि नगर, औरंगाबाद या जुन्या रोडवर तीन मजली रस्ताच्या डिझाईनचं काम चालू असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर तळेगाव ते शिरूर हा मार्ग विकसित करण्याचेही काम चालू आहे. त्यामुळे मुंबईकडून येणारे वाहने वळवता येणं शक्य होणार आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर आणि पुणे-शिरूर-नगर या रस्त्याचेही आराखडे बनवण्याचं काम सुरू असल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

भविष्यातील आव्हानांना भारताचं उत्तर म्हणजे विक्रांत – नरेंद्र मोदी

भारतीय नौदलालाचा नवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version