आज पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS)मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खडेबोल सुनावले आहेत. ‘खोके खोके ओरडणाऱ्यांकडे तर कंटेनर आहेत. प्रत्येक वेळी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन जनतेला इमोशनल करण्यात येत. यांनी कोवीडसुध्दा सोडला नाही. निवडणुक तोंडावर आली की हेच तुमच्याकडे येणार आणि कुणालातरी दाखवणार’, असा टोला राज ठाकरेंनी पनवेलमधील मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरेंना लगावला आहे. ‘एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यांच्या या बंडानंतर त्यांना गद्दार म्हटले जाते. त्यासोबतच त्यांचा उल्लेख करताना ५० खोके एकदम ओके असा केला जातो आहे. पण या घोषणा ठाकरे गटानेच निर्माण केल्या आहेत. तसेच मविआ एकत्र असताना त्यांच्याकडूनही ह्याच घोषणा दिल्या जात होत्या. जे ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत आहेत त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत.’ अशी टीका यावेळी राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केली आहे. मुंबईला बरबाद होण्यासाठी मोठा काळ जावा लागला. पण पुणे बरबाद व्हायचे असेल तर फारसा वेळ लागणार नाही. मी अनेकवेळा पुण्यात सभा घेऊन हे सांगितले आहे. आमच्याकडे टाऊन प्लानिंग केले जातच नाही. आमच्याकडे तर फक्त डेव्हलपमेंट प्लॅन येतो. पुण्यात गुदमरलेला मराठी माणूस आहे. तसेच कोकणात सुध्दा कोणीही येतात आणि जमिनी विकत घेतात.’ असे भाष्यही राज ठाकरेंनी यावेळी मेळाव्यात केले.