राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथे त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत कोकणातील वातावरण तापत असताना दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रिफायनरी ( Konkan Refinery Project) बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच राज ठाकरे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांना पत आहे. पण पोच नाही, अशी जळजळीत टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
कोकणात मनसेसाठी सकारात्मक वातावरण असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. कोकणातील पक्ष संघटना आगामी काळात मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जानेवारीत कोकणात दोन सभा घेणार असल्याचे त्यांनी म्हटले. एक सभा कुडाळ आणि दुसरी सभा चिपळूण किंवा रत्नागिरी येथे होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. मात्र, राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असेही त्यांनी स्पष्ट म्हटले. एक दोन प्रकल्प महाराष्ट्रातून दूर गेले आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय, बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.
राज्यपालांना कोणी काही सांगतं की काय असं वाटतं. वाद उकरून काढायचे आणि सर्व फोकस दुसरीकडे वळवायचा असं काही सुरू आहे का असं वाटतं. या मागे व्यूव्हरचना सुरू आहे का? अशी शंकाही येते. माणसाला पत येते, पण पोच येत नाही. त्यांना ती पोच नाहीच, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. शिवाजी महाराजांकडून काही घेऊ नका. फक्त वाद सुरू ठेवा. महाराजांनी जे सांगितलं जे घडवलं ते काही घेऊ नका. फक्त वाद करा. करत बसा म्हणावं. आपलं अपयश झाकण्यासाठी यासर्व गोष्टी काढल्या जातात. अनेक विषय काढले जातात. इतर विषयांवरचं लक्ष डायव्हर्ट होतं. त्यासाठीच हे सुरू आहे, असं ते म्हणाले.
कोणीही उठून इतिहासावर बोलणं योग्य नाही. कागदपत्रांच्या आधारे वस्तुस्थिती तपासली पाहिजे असे राज ठाकरे यांनी म्हटले. इतिहास हा रुक्ष आहे तो सिनेमात रंजक करून दाखवला तरच लोक पाहतात. इतिहासाला डाग लागू नये स्फुर्ती मिळावी या साठी चित्रपट तयार केले जातात. ज्यांना आक्षेप आहेत, त्यांनी चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधला पाहिजे. फक्त विरोध करू नये असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
हे ही वाचा :
Bigg Boss 16 : शिव ठाकरेंमुळे संपूर्ण घरातील सदस्यांच्या डोळ्यात आले अश्रू
देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्र्यांसोबत केली समृद्धी महामार्गाची पाहणी