Balasaheb Thackeray यांच्याबाबतीत Narayan Rane इतकी नमकहरामी करणार असतील तर यासारखं दुर्दैव नाही: Sanjay Raut

Balasaheb Thackeray यांच्याबाबतीत Narayan Rane इतकी नमकहरामी करणार असतील तर यासारखं दुर्दैव नाही: Sanjay Raut

राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी आता महाविकास आघाडीचे नेते मैदानात उतरले आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे (Shivsena UBT) गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) पाहणीसाठी गेले असता त्यावेळी नारायण राणे समर्थक आणि शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रवेशद्वारावरच मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून प्रतिक्रिया देत नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारकदेखील उद्धव ठाकरे सरकारी खर्चातून उभारणार असल्याचा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केलाय. यावरून संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर घणाघात केला. संजय राऊत यांनी आज (गुरुवार, २९ ऑगस्ट) माध्यमांशी संवाद साधत याविषयी वक्तव्य केले.

काय म्हणाले संजय राऊत?

नारायण राणे यांच्या वक्तव्याचा समाचार घेत संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे हे फक्त उद्धव ठाकरेंचे वडील नाही तरी या महाराष्ट्राचा बाप आहे. नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत इतकं नमकहरामी करणार असतील तर मला वाटतं यासारखं दुर्दैव नाही. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणे यांना मुख्यमंत्री केलं, सर्व पद प्रतिष्ठा दिली त्यांच्या पुतळ्यापर्यंत जर तुम्ही येत असतील तर मला असं वाटतं उद्याचं जे जोडे मारो आंदोलन आहे ते योग्य आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं, अफजल खान प्रमाणे यांच्या पोटाचं आता ऑपरेशन करावं का? ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं, ज्याने तुम्हाला मान प्रतिष्ठा, ज्यांनी महाराष्ट्र उभा केला घडवला त्यांच्या पुतळ्या संदर्भात तुम्ही प्रश्न उभे करता कुठे फेडाल हे पाप,” असे ते म्हणाले.

काय म्हणाले होते नारायण राणे?

राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर माजी खासदार आणि भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर शिवद्रोही अशी टीका केल्याचे माझ्या कानावर आले. पण त्यांच्याकडून दुसऱ्या कोणत्या भाषेची अपेक्षा नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयांना शिवसेनेने स्थापनेपासूनच उदरनिर्वाहाचे साधन बनवले. उद्धव ठाकरे यांनी शिवरायांचा एक तरी पुतळा उभा केला का? स्वतः च्या वडिलांचा पुतळासुद्धा सरकारी खर्चाने बनवणार आहे आणि म्हणूनच त्यांना बोलण्याचा अधिकार नाही,” अशी टिका त्यांनी केली होती.

हे ही वाचा:

महायुती आणि मविआला टक्कर देण्यासाठी महाराष्ट्रात तिसरी आघाडी स्थापन होणार, बच्चू कडूंनी केला मोठा दावा

मालवण मध्ये जे झाले ते महाराष्ट्राच्या गृहखात्यावर थुंकण्याचा प्रयत्न; Devendra Fadnavis गृहमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version