काल अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रामध्ये मोठा गदारोळ झाला. पण आज पुन्हा एकदा शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अर्वाच्य भाषेचा वापर वाढला असल्याचे चित्र दिसत आहे. शिवराळ भाषा वापरण्यात शिंदे गटातील नेत्यांची स्पर्धा सुरू आहे का, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली.
शिवसेनेच्या नेत्यांचा एकेरी उल्लेख करत रामदास कदम म्हणाले की, अनिल परब यांना लवकरात लवकर तुरुंगात टाकायला पाहिजे. त्यांना आत टाकण्यात एवढा उशीर का होत आहे? हेच मला कळत नाही. माझ्या मुलावर सगळ्यात जास्त अन्याय अनिल परबांनी केलाय. दापोली आणि मंडणगडची नगरपरिषद शिवसेनेच्या ताब्यात होती. पण अनिल परबांनी माझा मुलगा योगेश कदम यांना बाजुला ठेऊन, या नगरपरिषदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या घशात घालण्याचं काम केलं.
अनिल परब यांच्याविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रामदास कदम यांनी आज रत्नागिरीतील खेडमध्ये माध्यमांशी संवाद साधला. माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना अजून पर्यंत अटक का केली जात नाही असा सवाल रामदास कदम यांनी केला. अनिल परब यांनी शिवसेना संपवण्याचे काम केले. त्यांना लवकर अटक करायला हवी. दापोली-मंडणगडची नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात होती. ही नगरपालिका त्यांनी राष्ट्रवादीच्या घशात घातली. माझा मुलगा योगेश कदमला परब यांनी खूप त्रास दिला असल्याची टीका त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनादेखील आपल्या भोवती असेच XXX लागतात अशा अर्वाच्य भाषेत कदम यांनी टीका केली. कदम यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्यावरही टीका केली. देसाई हे उद्धव यांचे कान चावतात, त्यांचे कान भरत असल्याचे कदम यांनी म्हटले.
हे ही वाचा :
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेत काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्याचे निधन
औरंगाबाद दौऱ्या दरम्यान आदित्य ठाकरे म्हणाले, आजपासून मला छोटा पप्पू म्हणा…