राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा; गुलाबराव पाटील

राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा; गुलाबराव पाटील

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाहीए. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडे बोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली.

मागील काही दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वाद सुरू आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असा आरोप आमदार राणा यांनी केला होता. त्यानंतर आक्रमक झालेल्या बच्चू कडू यांनी रवी राणा यांना एक तारखेपर्यंत आरोप सिद्ध करावे, असा अल्टीमेटम दिला होता. दरम्यान, या वादात आता शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनीही उडी घेतली आहे. रवी राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा, अशी विनंती त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करियर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसेच दोघांनीही शांत बसवावं, हीच प्रार्थना असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

ठाकरे गटासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्याने शिंदे सरकारवर टीका होत आहे. यावरही मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. सुरक्षा काढण्यावरून कुणी राजकारण करत नसतो. एखाद्या नेत्याची सुरक्षा काढल्याने कुणाला काही आनंद होत नसतो. सुरक्षे संदर्भात एक समिती काम करते, त्यानुसार तो निर्णय होतो. या समितीने घेतलेल्या आढावानुसारच सुरक्षा करण्यात येते. कोणत्याही नेत्याची सुरक्षा काढण्यामध्ये सरकारला स्वारस्य नाही, असं शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. कटुता संपवावी अशी साद ‘सामना’तून शिवसेनेने देवेंद्र फडणीस यांना घातली आहे. यावरूनही मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. यापूर्वीच अशी साद घातली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्यावेळी फाटा फूट झाली, त्यावेळी आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच वेळी ही साद घातली गेली असती, तर आता बासुंदी कोण आणि अमुक कोण असं म्हणून कटुता संपवा… अशी म्हणण्याची वेळ आली नसती, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा :

‘कांतारा’चे निर्माते अडचणीत; ‘वराह रूपम’ गाणं चोरी केल्याचा आरोप

‘कांतारा’चे निर्माते अडचणीत; ‘वराह रूपम’ गाणं चोरी केल्याचा आरोप

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version