एकनाथ शिंदे नॉट रीचेबल हे प्रकरण सध्या बरेच चर्चेत आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे यांना विरोध केला तर काहींनी त्यांना साथ दिली. रविवारी अनेक शिवसैनिकांनी शिवसेना भवन येथे एकनाथ शिंदे यांचा विरोध करत मोर्चा आंदोलन सुरू केले. सध्या पोलिसांनी बाहेर होत असलेली तोडफोड आणि हिंसा पाहता १० जुलै पर्यंत जमावबंदी ही केली आहे. एकनाथ शिंदे ५० आमदारांन सोबत गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. बंडखोर १६ नेत्यांच्या विधिमंडळाचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली असून यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे हे गटासाठी कोणताही निर्णय घेऊ नये यासाठी त्यांच्या जागी गटप्रमुख म्हणून अजय चौधरी यांना नेमण्यात आले आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर आता एकनाथ शिंदे यांनीही आक्रमक भुमिका घेतली असून शिवसेनेच्या या दोन्ही निर्णयांवर आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून हे निर्णय रद्द करावेत अशी मागणी केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेने बंडखोर आमदारांना सोमवारी सायंकाळपर्यंत मुदत दिली आहे. यामुळे बंडखोर आमदारांनी आपल्यावरील कारवाई ही नियमबाह्य असल्याचे म्हटले आहे. सात दिवसांचा कालावधी देण्याचे नियमात असताना ४८ तासांची मुदत दिल्याचे यात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन बंडखोरी का केली याबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण आलं तरी बेहत्तर, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीसोबत सत्तेत सामील होण्यास विरोध दर्शविला आहे. तेव्हा महाराष्ट्रातील राजकरण यापुढे कोणतं वळण घेणार हे पहावं लागेल.