आज विधानपरिषदेचे मान्सून अधिवेशन (Maharashtra Assembly Mansoon Session) सुरु झालं. यादरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP SP) गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. याचवेळी त्यांनी ‘आमच्या पक्षात येणारे खूप आहेत पण घ्यायचे किती हा प्रश्न आहे’ असे वक्तव्य त्यांनी केले.
पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, ‘जिथे भाजपचा राजकीय विचार संपतो तिथे शरद पवारांचा विचार सुरु होतो. आधीच सांगितलं होत. भाजपला (BJP) आणि महायुतीच्या (Mahayuti) अनेक नेत्यांना कळणार सुद्धा नाही की काय घडले आहे, याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिला आहे. विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील अशी परिस्थिती येणार आहे. १८ ते १९आमदार शरद पवार व जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या संपर्कात आहेत, कुणाला घ्यायचं नाही घ्यायचं हे पवार साहेब आणि जयंत पाटील ठरवतील.’ पुढे जयंत पाटलांविषयी बोलताना रोहित पवार यांनी, ‘जयंत पाटील हुशार नेते आहेत त्यामुळे ही फक्त सुरुवात आहे पुढे जाऊन बघा होतेय काय’ असे वक्तव्य केले.
पुढे इतर नेत्यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षप्रवेशाविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘येणारे खूप आहेत घ्यायचे किती हा प्रश्न आहे आणि शरद पवार याबाबत निर्णय घेतील’ अजित पवारांबद्दल (Ajit Pawar) बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘भाजपचे नेते वागण्यामध्ये अजित पवारांसोबत दुजाभाव करत आहेत. भाजप नेते करतच होते आता कार्यकर्ते देखील अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागले हे आश्चर्य आहे. अजित पवारांबद्दल बोलणं बरेच जण टाळत होते कारण त्यांचा वेगळा दरारा होता, तो दरारा भाजपसोबत गेल्यावर कमी झाला आहे. भाजपसोबत अजित पवार राहिले तर त्यांना 20 सीट त्यांना लढाव्या लागतील. अजित दादांचे आमदार खुळे नाहीत, त्यांना माहित आहे की भाजप कोणत्या पातळीवर जाऊ शकते. येत्या काळात अजित पवारांची अजून राजकीय ताकत कमी करताना भाजप दिसेल.’ असे वक्तव्य त्यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.