राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज (बुधवार, १९ जून) आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून भाजपवर (BJP) जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात महायुतिला (Mahayuti) मिळालेल्या अपयशावर भाष्य करत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले. देवेंद्र फडणवीस यांचा भाजपचे चाणक्य असा उल्लेख करत रोहित पवार यांनी “शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी,” अशी जोरदार टीका केली.
रोहित पवार आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंट वरून म्हणाले, “मविआ च्या (Mahavikas Aghadi) विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना (Ajit Pawar) बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या (RSS) मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.”
पुढे ते म्हणाले, “परंतु मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी.”
हे ही वाचा
Kokan Graduate Constituency: पैशाच्या जोरावर विकत घेऊ पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा: Nana Patole
छगन भुजबळ ठाकरे गटात जाणार? संजय राऊत म्हणाले…