महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती (Maharashtra Drought) निर्माण झाली असून राज्यातील अनेक गावांना याचा फटका बसताना दिसत आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची (Water Shortage in Maharasahtra) भीषण परिस्थिती निर्माण झाली असून सामान्य लोकांपासून जनावरांनादेखील दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत. अश्यातच, विरोधकांकडून राज्य सरकारला (Maharashtra Government) धारेवर धरण्यात येत असून राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत असे आवाहनदेखील करण्यात येत आहे. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत, ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह असून इलेक्शन मोडमध्ये गेलेलं सरकार इलेक्शन संपूनही जागं होत नाही, सरकारमधील मंत्री, नेते कोणीही यावर बोलत नाही.’ असे वक्तव्य केले आहे.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले. यावरली ते म्हणाले, “राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत भयावह असून इलेक्शन मोडमध्ये गेलेलं सरकार इलेक्शन संपूनही जागं होत नाही, सरकारमधील मंत्री, नेते कोणीही यावर बोलत नाही. अशा स्थितीत पवार साहेब पत्रकार परिषद घेऊन राज्यातली दुष्काळी अवस्था मांडतात. परिणामी कालपासून सरकार आणि मंत्री दुष्काळावर बोलायला तरी लागलेत. ही असते लोकनेत्याची ताकद अन् लोकनेत्याची संवेदना…. असो! सरकारने तसंच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सर्व कामे थांबवून दुष्काळग्रस्त भागासाठी प्राथमिकता देऊन कामं करावीत, ही विनंती!”
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवार २४ मे रोजी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, “राज्यातील पावसाची स्थिती गंभीर आहे. राज्य सरकारने एकूण १९ जिल्हे तसेच ४० तालुके गंभीर आणि १६ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. एकंदर चित्र जर बघितलं तर ७३ टक्के महाराष्ट्र हा दुष्काळाच्या छायेत आहे. आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणं आहेत, पण या धरणाची अवस्था काही वेगळी नाही. छ. संभाजीनगर विभागातील ४४ धरणांमध्ये १० टक्के पाणी आहे, पुणे विभागातील ३५ धरणांमध्ये १६ टक्के पाणी आहे. नाशिक विभागातील २२ धरणांमध्ये २२ टक्के पाणी आहे. कोकण विभागातील ११ धरणांमध्ये २९ टक्के पाणी आहे.”
“राज्यात पिण्याची पाण्याची समस्या असून ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी आहेत. काही जिल्ह्यातली परिस्थिती बघितली तर आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं, तर आणखीन काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणी, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे,” असे ते म्हणाले होते.
हे ही वाचा:
राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तरी सरकारला गांभीर्य नाही: Raju Shetti
Follow Us