विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. राजकीय वर्तुळात मोठ्याप्रमाणावर चर्चा रंगत आहेत. ही विधानसभा निवडणूक येईपर्यंत अनेक पैलू उलगडताना दिसत आहेत. अशातच टाईम महाराष्ट्रचे (Time Maharashtra) संपादक राजेश कोचरेकर (Rajesh Kocharekar) यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची फेस टू फेस मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीदरम्यान संदीप देशपांडे यांनी आता होणारी लढत संपूर्ण महाराष्ट्र पाहणार असल्याचे भाष्य केले.
काय म्हणाले संदीप देशपांडे?
टाईम महाराष्ट्रचे संपादक राजेश कोचरेकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांना मुलाखतीदरम्यान, “राज साहेबांचे असे दोन लोक आहेत ते म्हणजे एक जय आणि दुसरा विरू. पण जेव्हा प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा जयची लॉटरी लागणार की विरूची? असे विचारल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “तो निर्णय घेतील ना राज साहेब, काही प्रोब्लेम नाही. जय असो नाही तर विरू. दोघं एकच आहेत, काही अडचण नाही.”
“आदित्य ठाकरेंबरोबर पॉलिटिकल पंगा घेण्याचं जे मटेरियल आहे ते काय आहे संदीप देशपांडेकडे?” असे विचारल्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, “कोणाचं तरी आडनाव काही तरी आहे याला मी घाबरणारा नाही. कारण माझ्यापाठी राज ठाकरे आहेत. त्यामुळे असल्या गोष्टींना मी घाबरत नाही. समोर कोण आहे, काय आहे आणि संघर्ष करूनच आम्ही या पदापर्यंत आलोय. तुम्ही माझा संघर्ष २००६ पासून बघितलेला आहे. जेव्हापासून मनसे स्थापन झाली तेव्हापासून तुम्ही मला बघताय. मी प्रत्येक गोष्टीत संघर्ष केलाय, जेलमध्ये गेलोय, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्यात, तडिपारीच्या नोटीस भोगलेल्या आहेत. त्यामुळे या संघर्षाला आम्ही घाबरत नाही आणि जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्यामुळे आता कोण समोर आहे या गोष्टीचा काही फरकच पडत नाही. आमच्या पक्षाचं काम आम्ही करतोय, आमच्या पक्षाने सांगितलं की, निवडणूक लढवायची. ती आम्ही जोमाने लढवणार. १००% मी खात्रीने सांगतो जी निवडणूक होईल, जी लढत होईल ती अख्खा महाराष्ट्र बघेल अशी लढत होईल,” असे मत संदीप देशपांडे यांनी व्यक्त केले.