चीनच्या राष्ट्रपतींना अहमदाबादमध्ये बोलावून झोपाळ्यावर झुले देऊन सन्मान करणाऱ्यांना काय म्हणणार? चीनने जगभरात घुसखोरी केली. त्यात भारतातही घुसखोरी केलीय. त्याच पद्धतीने घुसखोरी करण्याचा प्रयत्न कर्नाटक सांगली, कोल्हापूरात करतेय. बेसावध ठेऊन तुम्ही असे करणार असाल तर आम्हालाही तोच मार्ग अवलंबवावा लागेल. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतून आग लावण्याचं काम बोम्मई करतायेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर ते जे काही बोलले तेच बोम्मई मानायला तयार नाहीत. ते आमची संस्कृती काढतायेत. आम्हाला त्यांनी संस्कृती, संस्कार, भाषा शिकवण्याची गरज नाही. बोम्मई यांची जीभ जास्त वळवळतेय याचं कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची तोंडं बंद आहेत अशा शब्दात संजय राऊत यांनी कडाडून भाजपा-शिंदे सरकारचा समाचार घेतला. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“चीनने भारतात खुसखोरी केली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक महाराष्ट्रात घुसघोरी करते आहे, त्यामुळे आम्हालाही तोच मार्ग अवलंबावा लागेल, असं मी म्हटले होतो. जर बोम्मईंना चीनचा इतकाच तिटकारा असेल, तर आधी त्यांनी त्यांच्या पंतप्रधानांचा निषेध करावा, मोदींनीच चीनसाठी दरवाजे उघडले आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक वादात तेल ओतण्याचे काम बोम्मई करत आहेत. अमित शहांबरोबरच्या बैठकीत जे ठरलं होतं, ते मानायला बोम्मई तयारी नाहीत आणि आज ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढत आहे, आम्हाला त्यांनी संस्कृती आणि संस्कार सांगण्याची गरज नाही”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले आहे. आज बोम्मईंची जीभ चालते आहे, कारण शिंदे फडणवीस गप्प आहेत, असेही ते म्हणाले.
“काल विधानसभेत सर्वच विषयांवर चर्चा झाली आहे. गोंधळ झाला. अनावश्यक विषय चर्चेला आले. खोके सरकारचे आमदार ज्या पद्धतीने काल व्यक्तीगत विषयांवर बोलत होते, त्यांना कर्नाटकने मंजूर केलेल्या ठरावाबाबत माहिती नसावी? हे यांचे महाराष्ट्र प्रेम आहे. ज्यापद्धीने कर्नाटकने त्यांच्या विधानसभेत महाराष्ट्राला एक इचंही जमीन देणार नाही, असा ठराव मांडला. मुळात आम्हाला एक इंचही जमीन नको आहे, आम्हाला आमच्या हक्काचे बेळगाव, कारवार आणि इतर गावं हवी आहेत. हा आमचा कायदेशीर दावा आहे. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या विषयावर तोंड शिवून बसले आहे”, अशी टीकाही त्यांनी केली. “महाराष्ट्र कर्नाटक वाद बोम्मईंना त्यांच्या राजकीय फायद्यासाठी निर्माण केला आहे. आम्ही चीनचे एजंट असेल, तर तुम्ही कोणाचे एजंट आहात? जर तुम्हाला बोलायचा घटनात्मक अधिकार आहे, तर आम्हालाही सीमावासियांच्या हक्काबाबत बोलण्याचा घटनात्मक अधिकार आहे. महाराष्ट्रवर तुम्ही हक्क सांगता त्याला विरोध करण्याचा घटनात्मक अधिकार आम्हाला आहे”, असेही ते म्हणाले.
तसेच संजय राऊत यांनी क्लिनचीटच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी क्लिनचीट देण्याचा कारखाना काढला आहे. उद्या ते कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मईंनाही क्लिनचीट देतील. उद्या दाऊदने भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यालाही क्लिनचीट मिळेल. अबू सालेम तुरुंगात आहे. त्याने पत्र लिहून भाजपबद्दल बरं बोलला तर त्यालाही क्लिनचीट देतील. भाजपच्या राज्यात कुणालाही क्लिनचीट मिळू शकते. विरोधकांना गुन्हेगार ठरवलं जाऊ शकतं. मला क्लिनचीटचं फार आश्चर्य वाटत नाही. हा क्लिनचीटचा कारखाना आहे. आणि दिलासा घोटाळा या सूत्रीवरच हे राज्य चाललं आहे, असा हल्लाच संजय राऊत यांनी भाजपवर चढवला. शिंदे सरकारला अनेक शेपट्या फुटल्या आहेत. ते शेपट्या आत घालत आहेत. त्यांच्याकडे स्वाभिमान राहिला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. याची एसआयटी लावताय, त्याला एसआयटी लावताय, याला क्लिनचीट देता, त्याला क्लिनचीट देता. उद्या तुम्ही बोम्मईंनाही क्लिनचीट द्याल. आणि २० लाख बांधावांना गुन्हेगार ठरवाल. बोम्मईंवर खटला दाखल करा ना. आमच्यावर खटला दाखल करता, बोम्मईवर करा, असं आव्हानच त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिलं.
हे ही वाचा:
National Farmer’s Day 2022 २३ डिसेंबरला ‘शेतकरी दिवस’ का साजरा केला जातो ?