विधानसभा निवडणुकांना (Maharashtra Assembly Election 2024) अवघे दोन महिने उरल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज मनसेचा मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपच मांडला. यावेळची विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ‘लाडकी बहीण योजने’ वरून महायुती सरकारवरदेखील टीका केली. आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे हे नुकतेच परदेशातून आलेले आहेत. बराच काळ ते परदेशात होते, त्यामुळे या राज्यात काय चाललंय हे समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल. काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना बिन शर्ट पाठिंबा दिला होता, शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्धव ठाकरेंनी तेव्हा हे सांगितलं होतं. जणू काय महाराष्ट्रावरती फार काय उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय, ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवून देणार नाही असं ते म्हणाले होते त्यांना यांनी बिन शर्ट पाठिंबा दिला यातच सगळं आलय. आता एका महिन्यात त्यांची भूमिका बदलतेय आणि ते आता 288,225 काय त्या जागा लढणार आहेत हे आश्चर्यकारक आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी,महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल. यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही, काही पक्ष,काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे, म्हणून म्हटलं ते खूप काळ परदेशात होते हे खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इथली परिस्थिती माहित नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला कधी नव्हे ते इतकं यश मिळवल आहे. हे पक्ष टिकल्याचंच लक्षण आहे, कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे. आठ लोकसभेच्या जागा जिंकणं ही लहान गोष्ट नाही, त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांचं चिन्ह पळवून सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही ताकदीने उभे राहिलो, त्यांना आता या राज्याचा खूप अभ्यास करावा लागेल,” असे ते म्हणाले.
Prakash Ambedkar यांनी केले शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप