आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभरात ठिकठिकाणी दौरे, सभा, बैठका आणि यात्रा पार पाडल्या जात आहेत. अश्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे (Shivsena UBT) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य करत जोरदार हल्लाबोल केला आहे.
गृहमंत्री अमित शाह आज (मंगळवार, १ ऑकटोबर) मुंबई दौऱ्यावर आहेत. यावरून संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काही तरी होईल, अशीआम्हाला भिती वाटते,” अशी टीका त्यांनी यावेळी केली. ‘एखादा भूखंड अदानीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का ?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत यावेळी म्हणाले, “अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, गृहमंत्री देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या शाखांना भेटी देत आहेत ही अत्यंत गंभीर बाब आहे. देशाच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री किती गंभीर आहेत हे यातून दिसतंय. खरं म्हणजे ते मणिपूरला जाऊन थांबायला पाहिजे, कश्मीरमध्ये जे अतिरिके हल्ले सुरू आहेत तिथे जाऊन थांबायला पाहिजे. चीन अरुणाचलच्या सीमेवर जाऊन त्यांनी पाहणी करायला हवी, पण महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाराष्ट्रात जे घटनाबाह्य सरकार त्यांनी बसवलेल आहे, त्याला संरक्षण देण्यासाठी अमित शहा इथे येत आहेत. अमित शहा आणि मोदी महाराष्ट्रात आले कि आम्हाला भीती वाटते, काही तरी इथला उद्योग राज्याबाहेर जाईल किंवा एखादा भूखंड अदानीच्या घशात जाईल त्याची तयारी करायला हे लोक येतात का ? अमित शहा आज येत आहेत आणि काल दोनशे दहा एकर मिठाघराची जमीन अदानी ला देण्याचा निर्णय झाला. त्या जमिनीच मोजमाप करायला ते येत आहेत का व्यवहार पाहायला? भाजपचे दोन नेते इथे आले कि महाराष्ट्राच्या लुटी संदर्भात काहीतरी निर्णय होईल,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुदा देशाची राजधानी महाराष्ट्रात भरवतील असं मला वाटत. मोदी आणि शहा यांना सारखं सारखं इथे यावं लागतंय. याचा अर्थ लोकमत त्यांच्याशी विरुद्ध आहे, त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. म्हणून त्यांच्याशी हातात काहीतरी राहावं यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. पुण्यात एकाच मेट्रोच उद्घाटन त्यांनी सहा वेळा केलंय, अमित शहा गृहमंत्री असुन वोर्डा वोर्डात जाऊन बैठकी घेत आहेत याचा अर्थ राज्यातला भाजप कुचकामी आहे, फडणवीस पासून इतर सर्व नेते कुचकामी आहेत. त्यांनी इथे जी लोक इथे सत्तेवर बसवले ते कुचकामी आहेत, लोक त्यांना फेकून देणार आहेत,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
अमित शाहांचे मिशन मुंबई, दोन दिवसीय दौऱ्यात मुंबईतील विधानसभा मतदारसंघांचा घेणार आढावा
अदानीच्या प्रकल्पासाठी संपूर्ण प्रशासन दावणीला – काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत