महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

महायुतीत शिंदे गट आणि अजित पवार गट दोघेही आश्रित, भाजपचे तुकडे त्यांना स्वीकारावे लागतील: Sanjay Raut

आगामी विधानसभा निवडणूकीच्या (Maharaashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यभरात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाड़ीमध्ये (Mahavikas Aghadi) नेते आणि कार्यकर्ते कसून तयारीला लागलेले आहेत. दोन्हीही आघाड्यांमध्ये जागावाटपावरून चर्चांना सुरुवात झाली असून जागावाटपावरून रसीखेच होत असल्याचे दिसत आहे. अश्यातच महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट (Shivsena) आणि राष्ट्रवादी अजित पवार गट (NCP) हे लोकसभा निवडणुकांमधील मतदानाच्या स्ट्राईक रेटचा दाखला देत अधिक जागांची मागणी करत असल्याची माहिती समोर येत आहे. यावरूनच आता शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावर भाष्य केले असून भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला लक्ष्य केले आहे.

संजय राऊत यांनी आज (मंगळवार, १७ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत महायुतीवर जोरदार निशाणा साधला. ‘महायुतीत भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोघेही आश्रित आहेत. आश्रित आहेत त्यामुळे त्यांना आवाज नाही. स्वाभिमान, अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत,’ अश्या शब्दात त्यांनी महायुतीवर जोरदार आगपाखड केली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत यावेळी म्हणाले, “महायुती आम्हाला चर्चा करायची गरज नाही. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. महायुतीत भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे. बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे आणि जेव्हा पक्ष आश्रित असतात, तेव्हा त्यांना आवाज नसतो. भाजपबरोबर स्वाभिमानाने फक्त शिवसेना लढली होती आणि प्रसंगी लाथ मारून आम्ही बाहेर पडलो. अशी हिम्मत दुसऱ्या कोणामध्ये नाही. भाजपमध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ आहे. त्यामुळे जे काही त्यांच्यासमोर येतील ते तुकडे त्यांना स्वीकारावे लागेल. स्वाभिमान, अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील,” असे म्हणत त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समाचार घेतला.

स्ट्राईक रेटवर भाष्य करत ते पुढे म्हणाले, “स्ट्राईक रेट काय असतो? हा स्ट्राइक रेट भाजप आणि मोदी शहा मुळे झाला. मोदी, शाहानी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं. त्यामुळे पैसा, यंत्रणा हा सर्व त्यांचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेट ची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा. आणि निवडणूक लढवावी आणि स्ट्राइक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठेच येत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात उद्यापासून चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात महाविकास आघाड़ीमध्ये उद्यापासून (बुधवार, १८ सप्टेंबर) चर्चेला सुरुवात होणार आहे. संजय राऊत यांनी याविषयी भाष्य केले आहे. ते यावेळी म्हणाले, “जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. १८, १९ आणि २० या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल, कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी असेल,” असे ते यावेळी म्हणाले.

Sandip Deshpande Exclusive: कोणाचं आडनाव काय आहे, याने मला फरक पडत नाही कारण… | Sandip Deshpande

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version