काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर जोरदार टीका केली. यावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. तसेच राहुल गांधी यांनी आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचं म्हटलं. त्यात आता आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकर यांच्या माफीनाम्याच्या पत्राची थेट शिवाजी महाराजांच्या अफजल खान भेटीशी तुलना केली. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील सडकून टीका केली.
“खरं म्हणजे हिंदुस्तानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धवजींनी तरी बोटचेपीची भूमिका घेऊ नये, अशी आशा होती. पण उद्धवजींनी सत्तेसाठी माती खाल्ली आणि बोटचेपीची भूमिका घेतली”, असा घणाघात आशिष शेलारांनी केला. “केवळ मी, माझा पक्ष आणि माझ्या पक्षाला सत्ता देणारे सहकारी यासाठी स्वत:च्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धवजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली? हा आमचा सवाल आहे”, अशी टीका आशिष शेलारांनी केली.
उद्धवजींना विनंती आहे की, त्यांनी अभ्यास करावा. डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तत्कालीन काळातील वर्गांमध्ये महात्मा गांधींनी भेट दिली होती. या भेटीत संघ स्वयंसेवकांनी सेवा दिली होती. शिवाय महात्मा गांधींच्या विदर्भ भेटीतही स्वयंसेवकांनी सेवाकार्य केलं होतं, असंही शेलार यांनी म्हटलं.
“आशिष शेलार यांनी इंदिरा गांधींचं स्वातंत्र्यवीर सावकर यांना पाठवलेलं एक पत्र पत्रकार परिषदेत दाखवलं. “या पत्रात इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर असा उल्लेख केलाय. राहुल गांधी वीर या शब्दावरुन आपल्या भाषणात ताशेरे ओढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या आजीचं पत्रसुद्धा त्यांनी वाचलेलं नाही”, असं आशिष शेलार म्हणाले. “इंदिरा गांधी या सावरकरांचं युद्ध हे अतिशय धाडसी होतं असं म्हणतात. ब्रिटश सरकारच्या विरोधातील त्यांच्या कामांची नोंद इतिहासात होईल, असं कार्य सावरकरांनी केल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय”, असं शेलारांनी सांगितलं. “राहुल गांधी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी यांचा अभ्यास केला नाही. आता केवळ केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मतं एवढ्यापुरताच त्यांनी अभ्यास केलेला दिसतोय. म्हणून त्यांचं विधान हे बेअक्कलपणाचं आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो”, अशी टीका शेलारांनी केली.
दरम्यान आशिष शेलार यांनी सावरकर यांच्या माफीच्या पत्राची तुलना थेट शिवाजी महाराजांशी केली आहे. शेलार म्हणाले की, आपल्याकडे असंख्य महापुरुष आहेत जे दोन पावले मागे येऊन पाच पावले पुढं गेली. शत्रुला अलिंगन देऊन समोरच्यावर हल्ला करणारे आणि मी घाबरलो अस दाखवून समोरच्याचा कोथळा काढणारे असे अनेक महापुरुषांचे दाखले आहेत, असं म्हणत शेलार यांनी शिवाजी महाराजांचं उदाहरण दिलं.
हे ही वाचा :
Nawab Malik: नवाब मालिकांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या सावरकरविरोधी वक्तव्याचे पडसाद उमटले; राज्यभर निषेध आंदोलन
Ranjeet Savarkar : “राहुल गांधींना अटक करा”, रणजीत सावरकरांची मागणी