आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती आहे. आजच्या दिवसाचे औचित्य साधून शिंदे गट आणि भाजपने बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे देखील शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे. ते म्हणाले, निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय हे कागदी प्रकार आहेत. पण, शिवसेना काही कागदी वाघ नाही आणि उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख पद कुणी दिले नसून ते जनतेने त्यांना बहाल केले आहे. शिवसेनेचा इतिहास हा कोणत्याही शाहीने मिटवता येणे अशक्य आहे आणि जर मोदींच्या शिवसेनेला शिवसेनेचा इतिहास जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या सीमा पार करून पहाव्यात, असा सणसणीत टोला संजय राऊतांनी शिंदे गटाला लगावला आहे.
शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत बोलताना ते म्हणाले, आज आपली तीन चाकी रिक्षा आहे पण, प्रकाश आंबेडकरांचे चौथे चाकही आता आपल्यात सामील होणार आहे. हल्लीच्या काळात चोर मूर्तीही चोरायला लागलेत आणि मंदिरही बांधायला लागलेत. पावसाळा गेला की गांडुळांचे अस्तित्व संपते पण, अजूनही शिवसेना म्हंटले की उद्धव ठाकरे समोर येतात. आजचा हा उत्साह पाहून शिवसेनेचे भविष्य दिसत आहे.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री दावोसला गेले होते. त्यांना तिथे गुंतवणुकीचे कार्यालय दिसले. मुख्यमंत्री तिथे जाऊन बसले . त्यांना तिथे २-३ गोरे लोक दिसले. त्यांच्याशी काय बोलावं शिदेंना कळलं नाही आणि ते गोंधळले. मग तुम्हीही मोदींचीच माणसं का? असं म्हणत त्यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला आणि मोदींना पाठवून द्या असं ते म्हणाले
तसेच यावेळी शिवसेना ही एकच आहे आणि दुसरी शिवसेना महाराष्ट्र काय देशात होऊ शकत नाही असे संजय राऊत यांनी विरोधकांना यावेळी बजावलं. शिवसेना मिटवण्याचं, संपवण्याचा कट रचला जातोय असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
हे ही वाचा:
Governor Bhagat Singh Koshyari, कोण आहेत भगतसिंग कोश्यारी ?