मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात गुप्त बैठक झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अश्यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी यावर भाष्य केले असून धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा झाल्याचे सांगितले आहे. मराठा आरक्षण, मराठा आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. कृषिमंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी आज (रविवार ८ सप्टेंबर) पहाटे ३ वाजता अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळा चर्चाना सुरुवात झाली असून धनंजय मुंडे यांनी मात्र या भेटीचा इन्कार केला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्की काय शिजतय? असा प्रश्न सर्वाना पडला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत या भेटीबाबत भाष्य केले. मराठा आरक्षण, मराठा आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी यावेळेस सांगितले. जवळपास वीस मिनिटे त्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. आज परळी येथे मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक होणार असून त्या अगोदर झालेली हि बैठक महत्त्वाची मानली जात आहे.
माझी आरक्षणाची मागणी, त्यांच्या मनात काय ते माहित नाही: जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले. यावेळी ते म्हणाले, “काही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली, आंदोलनाविषयी चर्चा झाली, आरक्षणावर ही चर्चा झाली. माझी आरक्षणाची मागणी आहे. त्यांच्या मनात काय आहे माहित नाही. मला संघर्ष करावा लागला तरी मी संघर्ष करणार. त्यांनी शब्द दिला. ते कृषी मंत्री आहे, त्यांनी चांगलं काम शेतकऱ्यांविषयी केलं तर कौतुक करायला आणि अभिनंदन करायला काय हरकत आहे. आरक्षणावर ही चर्चा झालीय. कुणी चर्चांना आलं तरी माझा मराठा आरक्षणाचा दणका सुरु असतो. मराठा आणि ओबीसी एकच आहे. कुणी आला तरी मी मराठ्यांच्या बाजूने बोलल्याशिवाय सोडत नाही,” असे ते यावेळी म्हणाले.
परळी होणाऱ्या घोगडी बैठकीविषयी बोलताना ते म्हणाले, “आज बैठक परळीत होणार, सगळे मराठे बैठकीला येणार. मराठा घरी बसणार नाही, लोक येणार १००% येणार, मी मराठ्याकडून आहे. इथं कुणी येऊ शकत, अंतरवालीत येणारा पाहुणा असतो, आमच्या विरुद्ध बोलणारे पण येऊन गेले आहेत,” असे ते म्हणाले.