दसरा मेळाव्याच्या वादात शरद पवारांची घेतली उडी, म्हणाले…

सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे

दसरा मेळाव्याच्या वादात शरद पवारांची घेतली उडी, म्हणाले…

शिवसेना आणि शिंदे गट दशहरा मेळावा साजरा करता यावा यासाठी सातत्याने आपापल्या बाजूने प्रयत्न करत आहेत. अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून शिवसेना दसरा मेळावे भरवतेय. पण यावर्षी शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी न मिळाल्यामुळे नक्की दसरा मेळावा होणार का? आणि झाला तरी नेमका कोणाचा दसरा मेळावा होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलय. शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा, यासाठी परवानगी मिळवण्यासाठीचे पत्र शिवसेनेने २२ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेला पाठवले होते. आता एकनाथ शिंदे गटानेही याच जागी दसरा मेळावा व्हावा, यासाठीचे परवानगी मागणारे पत्र मुंबई महापालिकेला पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दसरा मेळाव्याला संबोधित करावे अशी मागणी मनसैनिकांनी त्यांना पत्र लिहून केली आहे. त्यामुळे आता दसरा मेळाव्याची परवानगी कुणाला मिळणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

शिवसेना आणि शिंदे गटातला हा वाद पेटला असताना आता या वादात या वादात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी उडी घेतली आहे. पवार यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. पवारांच्या या सल्ल्यामुळे ते शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मैदानात उतरले असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे,”. त्यामुळे शरद पवारांच्या या सल्ल्यावर शिंदे सरकार नक्की काय प्रतिक्रिया देतंय हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे गट आणि शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानावरून वाद न घालण्याचं आवाहन केलं आहे. शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून मेळावे घेत आले आहेत. त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावर मेळावे घेत आहेत. उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचं नेतृत्व करतील असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावरून वाद घालू नये, असं अजित पवार म्हणाले. ज्यांच्या हातात पॉवर आहे ते पाहिजे तशा गोष्टी करतात. आधी एकाचा आणि नंतर दुसऱ्याचा कार्यक्रम होईल. वाद घालू नका. शिवाजी पार्क मैदानावरील सभा झाल्यानंतरच जनता कोणाच्या पाठीशी आहे हे कळेल, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

हे ही वाचा:

कपिल शर्मा, दीपिका पदुकोण, रोहित शर्मासह इतर क्षेत्रातील दिग्गज करणार मेगा ब्लॉकबस्टरसाठी कोलॅब

अनंतचतुर्दशीच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version