हे सरकार हिंदुत्व द्रोही आणि बेकायदेशीर – संजय राऊत

संजय राऊत यांची शिंदे- फडणवीस सरकारवर घणाघाती टीका

हे सरकार हिंदुत्व द्रोही आणि बेकायदेशीर – संजय राऊत

संजय राऊत

नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत राज्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचे नामांतर, उस्मानाबादचे नामांतर तसेच नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव दिले. आता हे निर्णय नव्या सरकारने स्थगित केले आहेत. हे निर्णय जर स्थगित केले असतील तर हे सरकार हिंदुत्व द्रोही आणि बेकायदेशीर असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकार वर टीका केली आहे.

सध्या संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या निर्णयाबाबत आपले मत व्यक्त करताना म्हटले, “ठाकरे सरकारने राजीनामा देण्याआधी अनेक महत्वाचे निर्णय राज्यासाठी घेतले. औरंगाबादचे नामांतर करून संभाजीनगर केले. उस्मानाबादचं धाराशिव, नवी मुंबई विमानतळाला दी बा पाटील यांचे नाव दिले. हे सर्व निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदूत्व द्रोही, महाराष्ट्र द्रोही आहे हे सिद्ध झालंय. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर कधी करता यासाठी भाजप तेव्हा विचारत होते. उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर ते यांच्यासारखे ढोंगी लोक नाही.” असं संजय राऊत म्हणाले.

 

हे सरकार बेकायदेशीर
शिंदे – फडणवीस सरकारवर ताशेरे ओढत संजय राऊत पुढे म्हणाले, मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही. हे निर्णय बदलून काय साध्य केलं हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदूत्त्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हे निर्णय बदलता. आरे विषयावर ही आम्ही संघर्ष करु. औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झाला ? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे, त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय. वेळा जुळल्या तर शरद पवार यांची मी भेट घेईन. अशा कडक शब्दात संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर टीकास्त्र केले आहे.

Exit mobile version