महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ कायम सुरू असते. दररोज काहीना काही नवे बदल होताना दिसतात. अशाच महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या राजकीय घडामोडींचा साक्षीदार मानला जातो तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान, अर्थातच ‘वर्षा बंगला’. राज्यातील कित्येक लहान-मोठ्या नेत्यांचे स्वप्न असतं ते म्हणजे आपण मुख्यमंत्री होऊन शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राज्य करायचे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी हमरस्त्यावरील ‘सह्याद्री’ बंगला हे आपले अधिकृत निवासस्थान केले होते. चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी ही परंपरा कायम ठेवली. त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य वसंत फुलसिंग नाईक कृषिमंत्री होते. त्यांच्या वाट्याला ‘डग बीगन’ हा बंगला आला. कन्नमवार यांचे अचानक निधन झाल्यावर हाडाचे शेतकरी असलेले नाईक मुख्यमंत्री झाले. त्यांनी त्याच बंगल्यात राहायचा निर्णय घेतला आणि लगेच त्याचे ‘वर्षा’ असे नाव ठेवले.
हेही वाचा :
सुषमा अंधारे भेटणार ‘या’ शिंदे गटाच्या आमदारला
अशा अनेक आठवणींना उजाळा देणारा हा प्रभावशाली वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या नातेवाईंकासह कर्मचाऱ्यांवरही जादू करत असतो. राज्याच्या राजकारणात वावरणाऱ्या अनेकांना मुख्यमंत्री होऊन या बंगल्यात वास्तव्य करावे असे वाटत असते. साहजिकच मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांना ही ‘वर्षा’ वर वावरण्याचा मोह आवरत नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पीए व शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे. माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २९ जूनला वर्षा बंगला सोडून ‘मातोश्री’ गाठली. कारण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह उठाव केल्यावर आपलं सरकार वाचणार नाही ही गोष्ट ठाकरेंच्या लक्षात आली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यानंतरही मिलिंद नार्वेकर हे वर्षा बंगल्याच्या प्रेमात असल्याचे समोर येत आहे.
मिलिंद नार्वेकर यांच्या अधिकृत ‘ लेटरहेड’ वर अजूनही वर्षा बंगल्याचा लँड लाईन नंबर असल्याचं निदर्शनास आले आहे. नार्वेकर हे शिवसेनेने पक्षसचिवही आहेत. तसेच ते देशातील प्रतिष्ठीत अश्या मुंबई क्रिकेट संघटनेत सदस्य आहेत. त्याचप्रमाणे देशातील सर्वात श्रीमंत अश्या तिरूपती देवस्थानावरही सदस्य आहेत. या तिन्ही संस्थांची बोधचिन्हं नार्वेकरांच्या लेडरहेडवर आहेत. हे लेटरहेड नुकतेच नार्वेकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या बुलढाणा दौऱ्याच्या समन्वयासाठी वापरले होते. त्यावर चार महिन्यानंतर आजही वर्षा बंगल्याचा दूरध्वनी क्रमांक संपर्कासाठी छापलेला दिसत आहे. यावरून नार्वेकर अजूनही वर्षा बंगल्याच्या प्रेमात आहेत की काय असा प्रश्न निर्माण होतो. याबाबत प्रतिक्रिया जाणण्यासाठी मिलिंद नार्वेकरांना संपर्क साधला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.
Haryana Panchayat Election Result ‘या’ माजी मंत्र्याच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला