श्रीकांत शिंदे मनसे कार्यालयात; चर्चेला पुन्हा उधाण

श्रीकांत शिंदे मनसे कार्यालयात; चर्चेला पुन्हा उधाण

काही दिवसांपासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक चर्चेचा विषय बनली आहे. दिवाळी दीपोत्सवच्या निमित्ताने मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आलेले आपण पाहिले. त्यानंतर डोंबिवलीत ज्या ठिकाणी मनसेने दीपोत्सव ठेवला आहे, त्याच ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांनीसुद्धा आपला कार्यक्रम ठेवला. याच कार्यक्रमात भाजपचे माजी उपमहापौर राहुल दामले, मनसेचे माजी विरोधी पक्ष नेते व गटनेते प्रकाश भोईर उपस्थित होते. विशेष म्हणजे श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच मनसेच्या मध्यवर्ती शाखेत भेट दिली त्यामुळे भाजप-मनसे व शिंदे गट यांची महायुती होणार का, या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

तुम्ही नवीन नवीन अर्थ लावू नका, मनसेच्या माध्यमातून इथे दरवर्षी लायटिंग केली जाते, चांगलं चित्र बघायला मिळतंय आपल्याला, विरोधक पण एकत्र आले तर चांगलं आहे, दिवाळी सणानिमित्त सगळे एकत्र आहेत, कितीही विरोधक असलो, तरी सजेशन आणि ऑब्जेक्शन एकत्र घेऊन पुढे जायचं असतं, त्यातून चांगला मार्ग निघत असतो, असं श्रीकांत शिंदे म्हणाले. खरं तर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे राजकीय विरोधक म्हणून मनसेचे आमदार राजू पाटील ओळखले जातात. मात्र आता श्रीकांत शिंदे यांची मनसेशी जवळीक वाढताना दिसत आहे. स्थानिक पातळीवरही जुळवाजुळव सुरु झाल्याने येणाऱ्या काळात काय राजकारण घडते, याची राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागली आहे.

मनसे आमदार राजू पाटील हे काल अंबरनाथमध्ये मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांना राज ठाकरे यांची शिंदे-फडणवीस यांच्याशी जवळीक वाढत असल्याबाबत विचारलं असता, आमच्यासारख्या बाहेरून पाठिंबा असलेल्या पक्षांच्या मागण्या जर हे सरकार मान्य करत असेल, सकारात्मक प्रतिसाद देत असेल, तर जवळ येण्यास हरकत नाही, असं राजू पाटील म्हणाले. शिवाय एखादी मागणी केली की ती कशी पूर्ण होणार नाही, याकडे लक्ष दिलं जायचं, असा आरोप त्यांनी केला. तर शिंदे आणि फडणवीस सरकारकडून मात्र आमच्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक पावलं पडताना दिसत असून त्यामुळे जवळीक वाढली आहे हे मी मान्य करेन, असं राजू पाटील म्हणाले.

हे ही वाचा :

राणा आणि बच्चू कडू यांच्या मुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये संघर्ष

Surya Grahan 2022 : दिवाळीनंतर होणाऱ्या सूर्यग्रहणाला, या ६ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version