शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे.
महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना विरोधात बंड पुकारल्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. आता एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा एका ट्विट द्वारे दिला आहे.
“राजकीय आकसापोटी शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. ते व त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे”, असं शिंदेंनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे.
शरद पवारांनी या प्रकरणात हसतक्षेप करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिवसेना आता आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. बंड पुकारलेल्या या सर्व आमदारांवर सेनेने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी या आमदारांविरुद्ध आंदोलन केली जात आहेत. आमदारांच्या अनेक कार्यालयांची तोडफोड करण्यात आली आहे. शिवसैनिक रस्त्यांवर उतरून एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ असलेले बॅनर सुध्दा उध्वस्त करत आहेत.
दरम्यान एकनाथ शिंदे यांचा गट आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना पत्र देणार असल्याचं कळतंय. शिंदेचा गट हीच शिवसेना असल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे. येत्या काही तासात महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय घडामोडी घडतात हे पहावं लागेल.