राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचा झेंडा फडकावून राष्ट्रवादी काँग्रेस परिवारास वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपला पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २४ वर्षांचा प्रवास बघताना आपण १९ वर्षे सत्तेत राहिलो तर ६ वर्षे विरोधक म्हणून काम केले. स्थापनेनंतर इतकी वर्षे सत्तेमध्ये राहून आपल्या पक्षाला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. आता विरोधातही देशाची सेवा करण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहून नेतृत्व करण्याची ताकद जर कुठल्या पक्षात असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्यामुळे मोठ्या अपेक्षेने पाहिले जाते. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हणाल्या. या पक्षाच्या प्रवासाकडे जेव्हा बघताना पक्षाच्या जडणघडणीत उभारणीत असंख्य असे लोक होते ज्यांच्यामुळे हा पक्ष उभा राहिला. त्या सर्व दिवंगत सहकाऱ्यांचे कृतज्ञपूर्वक स्मरण करून त्यांना आदरांजली खासदार सुप्रिया सुळे यांनी अर्पण केली. या ठिकाणी विशेषतः गुरुनाथ कुलकर्णी व स्व. आर. आर. आबा यांची आठवण आवर्जून येते असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. अशा असंख्य लोकांनी पक्षासाठी दिलेले योगदान आपल्याला कधीच विसरता येणार नाही. आज आपल्यासोबत नवाबभाई नाहीत. मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी ते या कार्यक्रमाला नक्की उपस्थित असतील. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही हो सकता।असा विश्वासही खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
आपण खूप संघर्ष केला. सुरुवातीला आपल्याला राज्यात सत्ता मिळाली. नंतर केंद्रात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. देशातील अन्नधान्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आदरणीय पवारसाहेबांना खंबीर पाठिंबा मिळत एक महत्त्वाचे पद केंद्रात मिळाले. केंद्रीय कृषी मंत्री म्हणून १० वर्षात या देशाचा अन्नधान्याचा व दूधाचा प्रश्न सोडवण्यात आदरणीय पवारसाहेबांना यश मिळाले. खूप मोठी हरितक्रांती युपीए सरकारच्या काळात झाली. प्रफुल्लभाई पटेल यांच्यावर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री म्हणून जबाबदारी होती. देशातील शेवटचा माणूस आज ताठ मानेने विमानाने प्रवास करतो. एक वेळ वंदे भारत त्याला परवडणार नाही. पण सुरक्षितपणे विमानाने प्रवास करतो. याचे कारण युपीए सरकारच्या काळात देशातील विमानतळांचा झालेला विकास आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. काँग्रेससोबत आपण १५ वर्षे सत्तेत होतो. भुजबळ साहेब, अजितदादा, जयंतराव पाटील यांच्यासारख्या नेतृत्वाने राज्याला दिशा देण्याचे काम केले. अर्थमंत्री असताना जयंतरावांनी अर्थसंकल्पांची उत्तम मांडणी केली तर अजितदादांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी उत्तमरीत्या सांभाळली. महाविकास आघाडी सरकार असताना कोरोना काळात राजेश भैय्या टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेले कार्य कोणीच विसरू शकत नाही. जेव्हा जेव्हा या देशात कोरोनाबद्दल लिहिले जाईल तेव्हा राजेश टोपे यांचे नाव सुवर्णअक्षरात लिहिले जाईल असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
२४ वर्षांचा हा आपला प्रवास समाधानाचा व संघर्षाचाही आहे. काही लोक पक्ष सोडून गेले पण कार्यकर्ता जागेवर राहिला. या पक्षाची ताकद नेते आहेत त्याचबरोबर तुमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते आहेत जे पक्षासोबत राहिले. हीच या पक्षाची ओळख आहे. साहेबांनी ‘लोक माझे सांगाती’ हे पुस्तक लिहिले आहे. लोकच या पक्षाचे सांगाती आहेत. पुढील २५ वर्षे हा पक्ष ताकदीने उभा राहील. सत्ता येते आणि जाते. आज जे सत्तेत आहे त्यांना अस्वस्थता वाटत असावी. मला नक्कीच अस्वस्थता वाटली असती कारण राज्यात आज असुरक्षित वातावरण आहे. कोल्हापूर, सोलापूर, अमरावतीला झालेली घटना असेल ही काय पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारी नाही. महागाई, बेरोजगारी व जातीय तेढ असेल यातून देशाची व राज्याची प्रगती होत नसते. हे केंद्र व राज्य सरकारचे अपयश आहे. त्यामुळे आज विरोधी पक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी जास्त आहे. जेव्हा जेव्हा सरकार चुकते तेव्हा कणखर विरोधी पक्षाने आमची बाजू मांडावी ही अपेक्षा लोकांची असते. त्यामुळे महत्त्वाच्या जागेवर आपण उभे आहोत. पक्ष आहे म्हणून आपण सर्व आहोत. पक्ष हा आईच्या जागेवर असतो. बाकीची नाती ही वेगळ्या जागेवर असतात. गेल्या २४ वर्षात ज्या पदाधिकाऱ्यांनी, सहकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या पक्षाला वेळ दिला त्यांचे मनपूर्वक आभार मानत महाराष्ट्र आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण लढत राहू असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
श्रीकांत शिंदे यांना आता प्रत्येक सीटसाठी संघर्ष करावा लागणार राऊतांचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…