उद्धव ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare ) महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन त्या जाहीर सभा घेत आहेत. त्यांच्या सभांना मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसतेय. दरम्यान, भंडारा जिल्ह्यात असताना सुषमा अंधारे यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आणि केंद्रिय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. सुषमा अंधारेंनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान, सुषमा अंधारे यांची यात्रा महाप्रबोधन यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली आहे. भंडारा जिल्ह्यातील सभेत सुषमा अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
“एक काळ होता जेव्हा नागपूर आणि बीड यांच्यात संघर्ष चालायचा. इकडे नितीन गडकरी आणि तिकडे गोपीनाथ मुंडे अशी स्थिती होती. नितीन गडकरी बहुजनांचे नेते गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक ट्रॅपमध्ये अडकवायचे. गोपीनाथ मुंडे यांना जाणीवपूर्वक परेशान, हैराण करायचे. त्यानंतर दुसऱ्या पिढीलाही तेच सुरू झाले. देवेंद्र फडणवीस लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या मागे लागले आहेत. पंकजा मुंडे यांना हैराण करण्यास सुरूवात करण्यात आली,” असे मोठे विधान सुषमा अंधारे यांनी केले.
“मी बीडमधील आहे, तर त्यांना वाटतं ते मला हैराण करू शकतील. मात्र ते सध्या भ्रमात आहेत. तुम्ही माझ्यामागे ईडी लावू शकत नाहीत. उभ्या महाराष्ट्रात माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन नाही. माझ्या नावावर कुठेही एक एकर जमीन असेल तर मी यानंतर महाप्रबोधन यात्रेच्या स्टेजवर दिसणार नाही. मी कष्टाची भाकरी खाते. माझी आई कोरडवाहू जमिनीत राबते. माझ्या कुटुंबियांना राजकारणाबाबत काहीही माहिती नाही,” असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.
सुषमा अंधारे यांचा संभाजी भिडेंवर पलटवार
टिकली वरुन एका महिला पत्रकाराला बोलणारे संभाजी भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांच्या मंगळसुत्रावरील वक्तव्यावर बोलतील का? असे वक्तव्य सुषमा अंधारे यांनी करत भिडे गुरुजींवर पलटवार केला आहे. मुंबईच्या महिला पत्रकाराला मुलाखत घेताना टिकली नाही म्हणून मी बोलत नाही, असे वक्तव्य भिड़े गुरुजी यांनी केले होते. दरम्यान, अमृता फडणवीस यांना मंगळसूत्र घातले की, मला गळा आवळल्यांसारखे होते, त्यामुळे संस्कृती जपणारे भिडे गुरुजी अमृता फडणवीस यांना जाब विचारतील का? असा प्रश्न अंधारे यांनी विचारला आहे.
“उद्धव ठाकरे जेव्हा पायऱ्यांवरून उतरत होते. ते बघून माझी आई रडत होती. एवढ्या चांगल्या देवमाणसाला या लोकांनी त्रास दिला, असे माझी आई म्हणत होती. तेव्हाच मी उद्धव ठाकरे यांना साथ दिली पाहिजे, असे माझ्या मनात आले. आता आपण लढायचे ठरवले आहे,” असे म्हणत सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे गटातील कार्यकत्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा :
भाजपच्या प्रसाद लाड यांचे वादग्रस्त वक्तव्य, ‘शिवरायांचा जन्म कोकणात झाला’