आज राज्याच्या राजकारणात अनेक मोठे निर्णय हे घेण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या शिंदे सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईच्या वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे नाव बदलून वीर सावरकर सेतू केले आहे. त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे नावही बदलण्यात आले आहे. आता ते अटलबिहारी वाजपेयी स्मृती सेतू म्हणून ओळखले जाईल. याबाबतचा निर्णय बुधवारी दिनांक २८ जून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात सावरकरांच्या जन्मदिनी म्हणजेच २८ मे रोजी वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे नामकरण हिंदुत्ववादी विचारवंत वीर सावरकर यांच्या नावाने केले जाईल, अशी घोषणा केली होती. केंद्रीय शौर्य पुरस्काराप्रमाणे राज्यस्तरीय शौर्य पुरस्कारालाही स्वातंत्र्य वीर सावरकरांचे नाव देण्यात येईल, असेही शिंदे म्हणाले होते. मंत्रिमंडळ बैठकीची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज आम्ही ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. यामुळे १,२०,००० लोकांना रोजगार मिळेल. अनेक उद्योग महाराष्ट्रात येत आहेत. आपल्या राज्यात अनेक शक्यता आहेत. आता एफडीआयमध्ये महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आला आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करण्याचा निर्णयही या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्याचा लाभ तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विट करून मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली आहे.
याशिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. २ कोटी हेल्थ कार्डचे वाटप केले जाणार असून, त्याअंतर्गत ५ लाखांचे आरोग्य कवच उपलब्ध होणार आहे. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेची रक्कम १००० वरून १५०० रुपये करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी मंजूर झाले आहेत. जालना ते जळगाव या नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय पदवी महाविद्यालये उभारण्यासाठी 4365 कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
Air India – एअर इंडियाच्या विमानात आणखीन एक घाणेरडा प्रकार, प्रवाशाने सर्वांसमोर केलं…
पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले