राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. यादरम्यान प्रवक्त्याच्या वक्तव्यानंतर भाजपकडून शिवरायांचा अपमान झाल्याचं नाकारण्यात आलं होतं. दरम्यान आज या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली, यादरम्यान ते भावुक झाल्याचे देखील पाहायला मिळाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचे विचार दिले. आज सर्वच पक्ष महाराजांच्या नावाचा आणि प्रतिमेचा वापर करतात. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना अभिवादन केलं जातं. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करतो असं सांगतिलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव फक्त राजकारणासाठी घेतले जात आहे. परंतु. त्यांच्याबाबत कोणी आक्षेपार्ह बोलत असेल तर कोणाला राग कसा येत नाही. महाराजांबाबत गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते त्यावेळी देखील यांना कोणालाच राग का येत नाही. महाराजांची अशी प्रतिमा तयार केली तर पुढच्या पिढीला महाराज असे होते असेच वाटेल. आता जनतेने यावर विचार करणे गरजेचे आहे. युगपुरूषांची प्रतिमा मलिन करणाऱ्यांना कडक शिक्षा होण्यासाठी तसे कायदे केले पाहिजेत. अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. ते पुण्यात बोलत होते.
राज्यपालांना पदमुक्त केलं गेलं नाही तर तुमच्या खासदारकीचा राजीनामा देणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, ती त्या वेळची गोष्ट आहे, काय होईल काय नाही होणार ते पाहून मी त्यावेळी निर्णय घेईल. माझी भूमिका मी बदलत नाही. कुठल्याही राजकारणासाठी मी त्यापासून फारकत घेणार नाही, असे उदयनराजे यावेळी म्हणाले. तसेच, तीन डिसेंबर रोजी राडगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती देखील उदयनराजे यांनी यावेळी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असे ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा :
रितेश-जेनेलियाला मोठा धक्का! भुखंड प्रकरण भोवणार
MPSC: PSI-STI-Assistant मुख्य परीक्षेची तारीख पुढे ढकलली