spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ठाकरे गटाचे शिफारस पत्र विधानसभा अध्यक्षांनी फेटाळले तर शिंदेगटातील नेत्यांची नियुक्ती

समितीच्या सदस्यपदासाठीच्या नियुक्तीचं पत्र द्यावं आणि समितीच्या बैठकीला आमंत्रित करावं

मुंबई: विधिमंडळ कामकाज समितीमध्ये ठाकरे गटामधल्या एकाही आमदाराचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक धक्का बसला आहे.ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या पत्राची शिफारस विधानसभा अध्यक्षांनी फेटाळली असून त्यांनी शिंदे गटाकडून आलेल्या पत्राला मान्यता दिली आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्याकडून उदय सामंत आणि दादा भुसे याची कामकाज सल्लागार समितीसाठी नावांची शिफारस करण्यात आली होती. ती विधानसभा अध्यक्षांनी मान्य केली आहे.

तर शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी पत्र लिहून समितीच्या सदस्यपदासाठीच्या नियुक्तीचं पत्र द्यावं आणि समितीच्या बैठकीला आमंत्रित करावं, अशी मागणी पत्र लिहून प्रधान सचिवांकडे केली होती, पण विधानसभा अध्यक्षांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. या पत्रामध्ये शिवसेना अधिकृत पक्ष असून आपल्याला कामकाज सल्लागार समितीच्या सदस्यांची शिफारस करण्यासंबंधी कोणतंही पत्र दिलं नसल्याचं म्हटलं होतं. ही कृती बेकायदेशीर आणि नियमबाह्य असल्याचंही या पत्रात म्हटलं होतं.

प्रत्येक अधिवेशनाआधी विधिमंडळ कामकाज समितीची बैठक होते. या बैठकीत विधिमंडळाच्या कामकाजाबाबत चर्चा केली जाते. यंदाचं पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झाल्यानंतरचं हे पहिलंच अधिवेशन आहे. अजय चौधरी यांनी दिलेल्या पत्राची कोणतीही दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली नाही. तसेच त्यांच्या शिफासरीही ध्यानात घेतल्या जात नाहीत, यामुळे यंदाच्या आदिवेशनात शिंदे आणि ठाकरे सरकारमध्ये खटके उडणार हे नक्की.

विधानपरिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांना घेऊन बंड केला होता. एकनाथ शिंदे यांच्या या बंडामुळे महाराष्ट्रातलं महाविकासआघाडीच सरकार कोसळलं आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackrey)  राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या दोघांच्या शपथविधीनंतर काल भाजपच्या 9 आणि एकनाथ शिंदेंच्या 9 अशा 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

Latest Posts

Don't Miss