परतीच्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्याता ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आदित्य ठाकरे आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. राज्य सरकारचा कुठलाही मंत्री बांधावर गेला नाही अशी टीकाही त्यांनी केली. हे सरकार आल्यापासून राज्यातील चार प्रकल्प (Project) राज्याच्या हातून गेले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणांच्या हातचा रोजगार निघून गेला आहे. त्यामुळे राज्यांमधील जनतेत अस्वस्थता असून राज्यातील जनतेला उद्योग मंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. त्यामुळे तुम्ही उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार आहात का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ठाकरे सरकारमधील बड्या नेत्याने पहिल्यांदाच उद्योग मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. डबल इंजिनचं सरकार नीट सुरू होतं. कदाचित घटनाबाह्य सरकार आल्याने हे इंजिन फेल गेलं आहे. महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती. ती इतर राज्यात गेली आहे. कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल. तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले. उद्योजकांना या सरकारवर विश्वास नाही. गुंतवणूकदारांचा या सरकारवर विश्वास नाही. थोड्या दिवसाचं हे सरकार आहे. त्यांच्या अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी राज्याचं नुकसान होत आहे, असं सांगतानाच मला तुम्ही काहीही चिडवा, कोणत्याही नावानं बोला. पण महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. त्याकडे लक्ष द्या, असंही ते म्हणाले.
परतीच्या पावसामुळे शेतीचं नुकसान झालं आहे. दुसरीकडे उद्योग जगतातील चौथा मोठा प्रकल्प निघून गेला आहे. पहिला प्रकल्प वेदांता फॉक्सकॉनचा होता. तो गुजरातला गेला. बल्क ड्रग पार्क हा प्रकल्प हा चार अन्य राज्यांमध्ये गेला. पण राज्यात आणला गेला नाही. मेडिकल डिव्हाईस पार्क प्रकल्प आम्ही औरंगाबादेत आणणार होतो. त्यासोबत इंडस्ट्री आली असती. पण तोही हातचा गेला. आता एअर बस प्रकल्प गेला आहे. अनेक राज्य कंपन्यांसोबत चर्चा करतात, करार करतात आणि प्रकल्प आणतात. पण आपल्या सरकारकडून असं काही घडताना दिसत नाही, असं आदित्य म्हणाले.
हे ही वाचा :
राम शिंदे साहेब, पुड्या सोडू नका तर पुरावा द्या; रोहित पवार
राणांच्या आरोपांमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असून रवी राणा यांना आवर घालावा; गुलाबराव पाटील