ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) सुरू असणाऱ्या सत्तासंघर्षाला निवडणूक आयोगामुळे एक नवे वळण आले आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. याबरोबरच दोन्ही गटाला शिवसेना नावही वापरता येणार नसल्याचं म्हटले आहे. त्यामुळे यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहे. या सर्व प्रकरणी आता उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्ह मार्फत जनतेशी संवाद साधणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं पक्षचिन्ह गोठवलं आहे. त्यानंतर शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली होती. ‘जनतेला संयम बाळगायला सांगा’ असा संदेश उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, सुभाष देसाई उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह ला सुरवात केली तेव्हा ते म्हणाले या आधी मी फेसबुक लाईव्हमार्फत वर्ष या शासकीय निवासस्थानाचा त्याग केला आणि त्या नंतर मुख्यमंत्री पदाचा त्याग केला. आता या गोष्टीला २ महिने झाले. ज्यांना मुख्यमंत्रीपद पाहिजे होत त्यांनी ते घेतलं. सर्व गोष्टी झाल्या पण आपण काही बोलो नाही असं नाही आपण सर्व सहन केलं. पण आता मात्र अती व्हायला लागले आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना प्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथं पर्यंत ठीक होत पण आता स्वतःच शिवसेना प्रमुख व्हायला निघाले ते आता अती होत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. काही कारस्थानी लोकांनी बाळासाहेबांचे हिंदुत्व गोठवलं असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. निष्ठा ही विकत घेता येत नाही हे परवाच्या मेळाव्यावरुन स्पष्ट झालं असंही ते म्हणाले. दसरा मेळावा शिवतीर्थावर होऊ नये असे देखील प्रयत्न हे सुरु होते पण शेवटी न्यानदेवता देवता या शब्दाला जागली आणि तिने योग्य तो न्याय दिला. मिंधे गटाचा हेतू हा शिवसेनेला संपवण्याचा आहे, पण मी कुठेही डगमगलो नाही. कारण माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता अती व्हायला लागलं आहे. कारण शिवसेनाप्रमुखांचा मुलगा मुख्यमंत्री नको इथपर्यंत मनसुबे असू शकतात. पण हे स्वत: शिवसेनाप्रमुख व्हायला निघाले आहेत. हे अति होतंय. त्यासाठी आवाका काय हेही विचार करायचं आहे. पुढचं काही बोलायचं आधी मी सगळ्यांना धन्यवाद देतोय. दसरा मेळाव्यासाठी सर्वसान्य आले होते. दिव्यांग तरुण आळे होते. शिवसेना एक शिवसेना मानत आले होते. त्यांना धन्यवाद देतो. तुम्ही मानत आहात म्हणून ही परंपरा आहे.
४० डोक्याच्या रावणानं प्रभु रामाचं शिवधनुष्य गोठवलं. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेलं रक्तच पाहिजे. कारण शिवसेना म्हटलं की सळसळतं रक्त आणि तापलेलं डोकं. गोठलेल्या रक्तवाल्याचं इकडे कामच नाही. उलट्या काळजावाल्याचं काम नाही. अशी काही माणसं आणि त्यांची माणसं फिरतात, त्याचा राग येतो. ज्या शिवसेनेनं तुम्हाला राजकीय जन्म दिला. जी शिवसेना तुमची राजकीय आई आहे. त्या आईच्या काळजात कट्यार घुसवली. अशी ही उलट्य़ा काळजाची लोकं, त्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवलं. त्यांना आनंदानं उकळ्या फुटत असतील. पण त्याही मागे त्यांच्या मागे जी महाशक्ती आहे. तिला जास्त आनंद होत असेल.बघा आम्ही करुन दाखवलं. जे आम्हाला जमलं नाही, ते त्यांचीच माणसं फोडून करुन दाखवलं. कशीही माणसं काय मिळवलं तुम्ही, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
शिवसेना आणि तुमच्या नावाचा संबंध काय? नाव आजोबांनी दिलं, वडिलांनी रुजवलं, मी पुढे घेऊन जात आहे, तुम्ही त्याचाच घात करत आहात. असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच पुढे त्यांनी थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले आहे कि, बाळासाहेबांचं नाव न वापरता जनतेच्या समोर या, स्वत पक्ष काढा, भाजपामध्ये जा. आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत पण बाळासाहेबांचा मुलगा नको.
आजच्या फेसबुक लाईव्ह मार्गात उद्धव ठाकरे यांनी येत्या निवडणुकीसाठी पक्षाची तीन नावं आणि चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत.
तीन चिन्हं
1. उगवता सूर्य
2. त्रिशूल
3. मशाल
पक्षाची तीन नावं
1. शिवसेना बाळासाहेब ठाकरे
2. शिवसेना प्रबोधनकार ठाकरे
3. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मी डरनारा नाही. जनता काय फैसला करेल तो मला मान्य आहे. कारण तुमच्यासाठीच सर्व शिवसैनिक राबत असतात. स्वत:च्या जीवाचं रान करत असतात. तुम्ही सर्वोच्च आहात. लोकशाहीत जनता जनार्दन, सर्वात श्रेष्ठ आहे. त्या जनतेच्या दरबारात जायचं आहे. त्यामुळे आम्हाला चिन्ह आणि नाव लवकरात लवकर द्या, अशी मी आयोगाला विनंती करतो.
आता शेवटचो एकच सांगेन, आज योगायोगाने कोजागिरी पौर्णिमा आहे. कोजागिरी, लक्ष्मी येते म्हणतात हा भाग वेगळा, पण कोजागिरीचा अर्थ एकच आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे तुम्ही जागी राहा. अजिबात झोपू नका. आपल्याला शांत डोक्याने आणि आत्मविश्वासाने ही मोठी लढाई जिंकायची आहे. कारण ही लढाई जिंकल्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कोणी नसेल. म्हणूनच हात जोडून सर्वांना विनंती करतोय, आपलं प्रेम, विश्वास, आशीर्वाद असाच कायम ठेवा.
हे ही वाचा:
फेसबुक लाईव्हमार्फत उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका; ४० डोक्याच्या रावणानं …
उद्धव ठाकरे यांच्या गटाची चिन्ह ठरली