शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाला आणि अवघी मुंबई स्तब्ध झाली. ठाकरे कुटुंबाने मुंबईतील शिवाजी पार्कवर येत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केलं. उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि दोन्ही पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी शिवतीर्थावर येत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा बाजार मांडू नये, अशी विनंती त्यांनी केलीय.
“काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते हे समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे,” असा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसंच “शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आला. अन्यायाविरुद्धचा लढा आलाच. एका अर्थाने मला आजचा हा स्मृतिदिन मला काहीसा वेगळा आहे. कारण काही जणांना शिवसेनाप्रमुख कोण होते समजायला दहा वर्ष लागली. त्यांना आता शिवसेनाप्रमुखांबद्दलचा पुळका आला आहे. अनेक शिवसेनाप्रमुख आहेत, त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यात काही हरकत नाही. मात्र ते करताना त्याचा कुठे बाजार होऊ नये अशी माझी नम्र भावना आहे. बाजारुपणा दिसता कामा नाही. विचार व्यक्त करण्यासाठी कृती असावी लागते. कृतीतून विचार व्यक्त करता येतो. कृती नसेल तर विचार हा विचार राहत नाही, तर केवळ बाजारुपणा आहे. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नये एवढीच अपेक्षा करतो, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
राहुल गांधी जे बोलले त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात स्पष्ट भूमिका मांडली आहे. ‘राहुल गांधी जे बोलले ते चूकच आहे. आमच्याबद्दल सांगायचं तर स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर आहे. स्वातंत्र्यावीरांबद्दल प्रेम कोण व्यक्त करतंय हे देखील पाहावं. स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. सावरकरांनी जे स्वातंत्र्य मिळवून दिलं ते आज धोक्यात आलं आहे. ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्यवीरांप्रमाणे आधी वागायला शिका, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
पत्रकारांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यासंदर्भात विचारणा केली असता उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपाला सगळ्याचाच ताबा पाहिजे. तो द्यायचा की नाही, हे देशातल्या जनतेनं ठरवायचं आहे. सगळंच आपल्या बुडाखाली घ्यायचं, हाच भाजपाचा मनसुबा आहे. देशात लोकशाही आहे. स्वप्न बघणं हा लोकशाहीतला अधिकार आहे. त्यांनी ती जरूर बघावीत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपालाही सुनावलं आहे. भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेनाप्रमुखांचं स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावं, अशी मागणी केली आहे. “बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाचं नाही. ते स्मारक महाराष्ट्राचा स्वाभिमान व्हावं. त्यासाठी राज्य सरकारनं ते ताब्यात घेऊन त्याची संपूर्ण देखभाल करावी. स्मारकाच्या देखभालीसाठी एखादी समिती स्थापन करून ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची तिथे नेमणूक करावी”, अशी मागणीवजा सल्ला प्रसाद लाड यांनी दिला आहे. या सल्ल्याचा उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.
हे ही वाचा :
Uddhav Thackeray Live : स्मारक ताब्यात घेण्याचं स्वप्न त्यांनी बघावं, मग पाहू – उद्धव ठाकरे