मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेने शिंदे गटातील आमदारांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली याच्या उर्वरित भागावर उद्या सुनावणी होणारा आहे. यात दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्ती वाद केला. या सुनावणी नंतर उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया मांडली.
सत्तांतर झाल्यापासून ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर सातत्याने गर्दी होत आहे. दरम्यान मातोश्रीवर आलेल्या जळगावातील शिवसैनिकांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, “आमची लढाई दोन तीन पातळ्यांवर सुरू आहे. रस्ता आणि कागदावरच्या लढाईत आम्ही मागे पडणार नाही. या कायद्याच्या लढाईत माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. वकील योग्य बाजू मांडत आहेत. आजपर्यंत अनेक वेळा शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. आता शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे मी या आधी देखील बोललो होतो की हा प्रयत्न शिवसेना संपवण्याचा आहे आणि ते परवा भाजप अध्यक्षांनी बोलून दाखवले. पण त्यांना कल्पना नाही की शिवसेनेने अशी आव्हानं पायदळी तुडवत भगवा रोवलेला आहे. त्यामुळे राजकारणात हार जीत होत असते. पण कोणी कोणाला संपवण्याची भाषा याआधी आपल्या देशात राजकारण्यांकडून झाली नव्हती.” असे ठाम मत ठाकरे यांनी मांडले.