काश्मिरमध्ये दहशतवादी सैनिकांवर हल्ले (Jammu Kashmir Terrorist Attack) करतात, त्याची चुणूकही सरकारला लागत नाही, जवानांच्या हौतात्म्यावर सरकार राजकारण करू पाहत आहे, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. संसदेत लोक कशी घुसली, असे विचारल्यानंतर आमचे निलंबन करण्यात आले. आता पुंछच्या बाबतीत प्रश्न विचारला तर आम्हाला देशाबाहेर काढतील, असे संजय राऊत म्हणाले.
ठाकरे गटाचे संजय राऊत म्हणाले, काश्मीरमधील आतंकवादी आमच्या सैनिकांवर हल्ले करतात, त्याची चुणूकही सरकारला लागत नाही. जवानांच्या हौतात्म्यावर सरकार राजकारण करू पाहतंय, दोन महिन्यांमध्ये जवानांच्या हत्येचा आकडा बघितल्यानंतर , थरकाप होईल. संसद चालूच देत नाही. आम्ही प्रश्न विचारला की, संसदेत लोक कशी घुसली? आमचे निलंबन केले. आता आम्ही पुंछच्या बाबतीत प्रश्न विचारला, तर आम्हाला देशाच्या बाहेरच काढतील. आमचे सदस्यत्व रद्द करतील. प्रश्नच विचारायचे नाही, ही कोणती लोकशाही? सरकारला लाज वाटत नाही, सरकार कोणता उत्सव साजरा करतंय? आणि कोणासाठी? विरोधी पक्षांच्या खासदारांची कत्तल करायची आणि त्याचवेळी आमच्या जवानांची कत्तल उघड्या डोळ्यांनी पाहून राम मंदिराच्या घंटा वाजवायला जायचं. या घंटा यांच्या डोक्यात आपटल्या पाहिजे, असेही संजय राऊत म्हणाले.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अजूनपर्यंत शिवसेनेला आमंत्रण देण्यात आले नाही. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, ज्यांचे योगदान आहे त्यांना कधी बोलावणार नाही. अजून कोणत्याही प्रकारचे निमंत्रण आले नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे मोठे योगदान आहे. आम्हाला आमचा हिस्सा मिळणार नाही. सर्वकाही या लोकांनी केलं आहे . जर तुम्हाला राम मंदिराचे क्रेडिट घ्याचे असेल, तर संसदेत जे घडतंय, पुंछमध्ये जे घडतंय याचीही जबाबदारी स्विकारा.राम मंदिर कोणा एकट्याची जहागीर नाही, अयोध्येत रामाचे मंदिर होणे हीच गर्वाची बाब आहे, कारण आमचे योगदान आहे. पण आम्हाला तो राजकीय मुद्दा करायचा नाही. आम्ही त्यावर मतं मागणार नाही. हे सर्व राजकीय उत्सव झाल्यानंतर आम्ही तिथे जाणार आणि रामललाचा आशीर्वाद घेणार, असे संजय राऊत म्हणाले.
हे ही वाचा:
कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा
शिंदे गटाच्या ‘या’ नेत्यांनी केला मोठा दावा, निवडणुका धनुष्यबाणावर…