काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) ७२ वा दिवस आहे तर महाराष्ट्रातील यात्रेचा १२ वा दिवस आहे. तर विदर्भात या यात्रेचा आजचा ४ दिवस आहे. सकाळी ६ वाजता अकोल्यातील कुपट बाळापूर येथून पदयात्रेला सुरूवात झाली. राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून निषेध करा असा आदेश मनसैनिकांना दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यांवरून नाना पटोल्यांनी मनसेलाच चांगलाच टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलचं तापलं आहे. भाजपसह मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच राहुल गांधींवर जोरदार टीकाही केली आहे. यात्रा आता बुलढाणा (Buldana) जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी देखील आज राहुल गांधी यांच्या भारत जोडे यात्रेमध्ये भाग घेतला. दरम्यान, दुपारच्या सत्रात ४ वाजता शेगाव इथं गजानन महाजारांचे दर्शन घेतल्यानंतर साडेसहा वाजता राहुल गांधींची जाहीर सभा होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज राहुल गांधी काय बोलतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनसे कोण? असा उपरोधी टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी लगावला. ते आम्हाला काळे झेंडे दाखवत असतील तर आम्ही त्यांना गुलाबाचे फुल देऊ असे सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनसेच्या विरोधाची हवा काढण्याचा प्रयत्न केला. मनसेने कितीही विरोध केला तरीही यात्रा रोखता येणार नाही, हे राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे. यात्रा कोणीही थांबू शकणार नाही. शेगावच्या सभेसाठी काँग्रेसची मोठी तयारी झाली आहे. मोठ्या संख्येने तिथे कार्यकर्ते पोहोचणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. मनसे हा एक स्टंटबाज पक्ष आहे. भारत जोडो यात्रेविरोधात देखील त्यांचा एक स्टंट असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी व्यक्त केले. आज मनसेच्या वतीने शेगावच्या सभेमध्ये काळे दाखवण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यावर भाई जगताप बोलत होते. तर मनसेने कितीही विरोध केला तरी संपूर्ण विदर्भात आणि राज्यातून पाच लाख काँग्रेसचे कार्यकर्ते शेगावच्या सभेत पोहोचणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी दिली. आजच्या सभेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेसचे जेष्ठ नेते मुकुल वासनिक, भाई जगताप, नसीम खान, सुनील केदार, मिलिंद देवरा, दिपेंद्र सिंग गुड्डा यांच्याससह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.
मनसे शेगावच्या सभेत काळे झेंडे दाखवणार –
राहुल गांधी यांच्या शेगावमधील सभेत त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिला आहे. त्यानंतर नागपुरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. पोलिसांनी मनसैनीकांना १४९ ची नोटीस बजावली आहे. उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
काय म्हणाले होते, राहुल गांधी?
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
हे ही वाचा :
स्वातंत्रवीर सावरकर यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही; मनसे करणार निषेध