भारतीय महिला अंडर-१९ संघाने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या अंडर-१९ महिला टी-२० विश्वचषकात इतिहास रचला आहे. पहिल्या टी- २० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ९ बाद १०७ धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात श्वेता सेहरावतच्या नाबाद ६१ धावांच्या जोरावर भारताने १४.२ ओव्हरमध्ये २ गडी गमावून ११० धावांनी विजय मिळवला.
भारतीय कर्णधार शेफाली वर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शेफालीचा हा निर्णय योग्य ठरला. मन्नत कश्यपने न्यूझीलंडच्या अॅना ब्राउनिंगला आपला शिकार बनवले. इमा मॅक्लिओडलाही विशेष काही करता आले नाही. २ धावांवर तीतस साधूने तिची विकेट घेतली. जॉर्जिया प्लमरने ३५ आणि इझी गेजने २६ धावा करत थोडा संघर्ष केला, पण दोघींनाही संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवता आले नाही. हे दोघी बाद झाल्यानंतर न्यूझीलंडला २० ओव्हरमध्ये ९ गडी गमावून १०७ धावाच करता आल्या. भारताकडून पार्श्वी चोप्राने ३ विकेट घेतल्या. तीतस साधू, मन्नत, कॅप्टन शेफाली आणि अर्चना यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
१०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला अंडर-१९ संघाने दमदार सुरुवात केली. कर्णधार शेफाली वर्मा आणि श्वेता सेहरावत यांनी पहिल्याच ओव्हरपासून आक्रमणाला सुरुवात केली. मात्र, १० वेगवान धावांनंतर शेफाली अॅना ब्राउनिंगने घेतलेल्या विकेटमुळे शेफालीला आऊट व्हावे लागले. तर दुसरीकडे श्वेताने आपले अर्धशतक पूर्ण केले. श्वेताने ४२ चेंडूत ६१ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी सौम्या तिवारीने २२ धावांचे योगदान दिले. त्रिशा ५ धावा करून नाबाद राहिली. भारताने पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय अंडर-१९ संघाने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा:
मेहाच्या प्रेमात अक्षर पटेल झाला आऊट, वडोदरा येथे पार पडला विवाह सोहळा
उद्धव ठाकरेंच्या पक्षात प्रवेश करताच अद्वय हिरे यांचा भाजप विरोधात हल्लाबोल