जगण्यासाठी आणि शिक्षणासाठीच्या वैयक्तिक संघर्षापासून दलितांच्या उत्थानापर्यंत आणि स्वतंत्र भारताची राज्यघटना साकारण्यापर्यंत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास हा खडतर होता. या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं. मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा असाध्य आजारांनी ते त्रस्त होते. संधिवाताच्या त्रासामुळे त्यांना अनेक रात्री बिछान्यात तळमळत पडून राहावे लागत असे. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (खंड-१२)- चांगदेव खैरमोडे, डॉ. आंबेडकरांच्या सहवासात- डॉ. सविता आंबेडकर, डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात (चरित्र व आठवणी)- वैशाली भालेराव या पुस्तकांचा संदर्भ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी जाग्या करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्याचा प्रयत्न केला आहे.
१९५६ च्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब दिल्लीबाहेर होते. १२ नोव्हेंबरला ते पाटणामार्गे कांठमांडूला गेले. तिथे १४ नोव्हेंबरला जागतिक धम्म परिषदेला सुरुवात होणार होती. या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे नरेश राजे महेंद्र यांनी केले. या कार्यक्रमात नेपाळच्या राजेंनी व्यासपीठावर बाबासाहेबांना शेजारीच बसायला सांगितले. यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. बाबासाहेबांचं बौद्ध जगतातील स्थान यावरून ठळक दिसून येतो. काठमांडूत गौतम बुद्धाचं जन्मस्थान असलेल्या लुंबिनीला, ऐतिहासिक अशोक स्तंभाला, नंतर परतताना पाटण्याहून बुद्धगयेला बाबासाहेबांनी भेट दिली. या भल्यामोठ्या प्रवासानंतर ३० नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले, तेव्हा ते थकले होते. इकडे राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू झालं होतं. मात्र, प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना जाता येत नव्हतं. तरीही ४ डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत अधिवेशनाला जाण्याचा अग्रह धरला.डॉ. मालवणकर बाबासाहेबांसोबत होते. त्यांनी तपासून जाण्यास हरकत नसल्याचं सांगितलं. बाबासाहेब राज्यसभेत गेले आणि दुपारीच परतले. दुपारी जेवल्यानंतर ते झोपले. बाबासाहेबांची संसदेतली ही शेवटची भेट ठरली. १६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा बाबासाहेबानी नियोजित केला होता. बाबासाहेबांच्या हस्तेच नागपूरसारखं धर्मांतर व्हावं, असं मुंबईतील नेतेमंडळींना वाटत होतं. तिथे बाबासाहेब आणि माईसाहेब उपस्थित राहणार होते.मुंबईतील या धर्मांतर सोहळ्यासाठी जाण्यासाठी १४ डिसेंबरच्या तिकीट आरक्षणाची चौकशी बाबासाहेबांनी रट्टूंकडे केली. प्रकृती पाहता बाबासाहेबांनी विमानानं जावं, असं माईसाहेबांनी म्हटलं. मग त्यानुसार विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्याचे बाबासाहेबांनी रट्टूंना सांगितलं. नंतर बराच वेळ बाबासाहेब रट्टूंना टायपिंगचा मजकूर सांगत होते. नंतर अकरा-साडेअकराच्या सुमारास बासाहेब झोपले आणि रट्टूंनाही उशीर झाल्यानं ते तिथेच बंगल्यात झोपले. ६ डिसेंबरला म्हणजे निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी साडेआठच्या दरम्यान बाबासाहेब उठले. माईसाहेबांनीच चहाचा ट्रे नेत त्यांना उठवलं. तिथेच दोघांनी चहा घेतला. तितक्यात ऑफिसला जाण्यासाठी निघेलेले नानकचंद रट्टू तिथे आले. तेही चहा प्यायले आणि निघाले. बाबासाहेबांना प्रात:र्विधी उरकण्यासाठी माईसाहेबांनी मदत केली. मग न्याहारीसाठी टेबलावर आणून बसवलं. बाबासाहेब, माईसाहेब आणि डॉ. मालवणकर अशा तिघांनी एकत्रित न्याहारी केली आणि नंतर बंगल्याच्या व्हरांड्यात गप्पा मारत बसले, बाबासाहेबांनी वर्तमानपत्रं वाचली. मग माईसाहेबांना औषधं, इंजेक्शन देऊन स्वयंपाकघरात कामाला गेल्या. बाबासाहेब आणि डॉ. मालवणकर तिथंच गप्पा मारत बसले. मग माईसाहेब बारा-साडेबारा वाजण्याच्या सुमारास बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या. तेव्हा बाबासाहेब लायब्ररीत लिहीत-वाचीत बसले होते. ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या पुस्तकाच्या प्रस्तावनालेखनाचं काम ते पूर्ण करत होते. बाबासाहेबांना माईसाहेब जेवायला घेऊन आल्या. जेवण झाल्यावर बाबासाहेब झोपले.
चांगदेव खैरमोडेंनी बाबासाहेबांच्या चरित्राच्या १२ व्या खंडात लिहिल्याप्रमाणे, ६ डिसेंबरला जैनांचे संमेलन भरणार होते आणि त्यात जैन मुनींबरोबर चर्चा करून जैन धर्म आणि बौद्ध धर्मात ऐक्य घडवण्यासाठी बाबासाहेबांनी चर्चा करावी, असं त्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं. ५ डिसेंबरच्या रात्री नानकचंद रट्टू गेल्यानंतर बाबासाहेबांनी ‘दि बुद्धा अँड हिज धम्मा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत सुधारणा केली. मग एस. एम. जोशी आणि आचार्य अत्रेंना, तसंच ब्रह्मी सरकारला पाठवण्यासाठीच्या पत्रांवर शेवटचा हात फिरवला आणि त्या दिवशी नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडेअकराच्या सुमारास झोपी गेले. ५ डिसेंबरची रात्र ही त्यांच्या आयुष्याची अखेरची रात्र ठरली. ६ डिसेंबर १९५६ ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या. चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खोलीकडे गेल्या. सकाळचे सात-साडेसात वाजले होते.
माईसाहेब लिहितात की, “खोलीत गेल्यावर पाहिलं की, साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता. मी साहेबांना दोन-तीनवेळा आवाज दिला. पण त्यांची काही हालचाल दिसली नाही. मला वाटले की, त्यांन गाढ झोप लागली असेल, म्हणून मी त्यांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला आणि…” बाबासाहेबांचे झोपेतच परिनिर्वाण झाले होते. नानकचंद रट्टूंनी प्रमुख परिचित लोकांना, सरकारी खात्यांना, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, यूएनआय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली. ही वार्ता वणव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाच्या वेदनाही वणव्याच्या वेगानं देशभर पसरल्या. हजारो अनुयायी दिल्लीतल्या २६, अलिपूर रोडच्या दिशेनने येऊ लागले. जगजीवनराम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसारच पुढे पार्थिव नागपूरमार्गे मुंबईच्या दिशेने नेण्यात आले. पुढे मुंबईत अभूतपूर्व अंत्ययात्रा देशाने पाहिली.
हे ही वाचा:
KBC च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्याचं केलं कौतुक
Politics: राष्ट्रवादी पक्ष पवार साहेबांमुळेच वाढला, जितेंद्र आव्हाड यांची पोस्ट चर्चेत