देशभरात गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांची धूम पाहायला मिळत आहे. राजधानी मुंबईत लालबागचा राजासह गणेश गल्लीतील सर्वच प्रसिद्ध व मानाच्या गणपती बाप्पांची जल्लोषात मिरवणूक सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मुंबईत (Mumbai) आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईतील बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक टीव्हीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर पाहिली जात आहे. मात्र, विसर्जनासाठी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडण्याचा उत्सव सुरू असतानाच मुबंईत जिओचं (Jio) नेटवर्क बंद झाल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला. तब्बल पाऊणतास हे नेटवर्क बंद झाल्याने सोशल मीडियावरही अंबानींना ट्रोल करण्यात आलं.
मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स जिओचे मुंबईतील नेटवर्क डाऊन झाले आहे. Jio नेटवर्क सिम वापरणाऱ्या काही वापरकर्त्यांनी X (जुने नाव Twitter) वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. त्याचबरोबर काही युजर्सनी मुकेश अंबानी यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत राहणाऱ्या अनेक वापरकर्त्यांनी इलॉन मस्कच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्या फोनचे स्क्रीनशॉट पोस्ट केले आहेत ज्यांना कॉल किंवा मेसेज करता येत नाही. आज १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:१५ ते दुपारी १२:३० पर्यंत जिओ नेट डाऊन होते.
Jio सर्व्हर डाउनबद्दल १०,००० हून अधिक अहवाल दाखल केले गेले. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की जिओ वापरकर्त्यांना जिओ सिम सेवा वापरताना समस्या येत आहेत. लोकांनी शेअर केलेल्या स्क्रिनशॉट्समध्ये मोबाईल फोनमध्ये एअरटेलचे नेटवर्क येत असल्याचे दिसून येते, मात्र जिओचे नेटवर्क अजिबात येत नाही. जिओचे सर्व्हर डाउन झाल्यानंतर काही लोकांनी रिलायन्स जिओ कंपनीचे मालक आणि भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांना ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. Jio च्या मोबाईल नेटवर्क सोबत, यूजर्सना Jio चा ब्रॉडबँड सर्व्हर म्हणजेच Jio Fiber वापरण्यात देखील समस्या येत आहेत. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी ही माहिती दिली आहे की ते अचानक Jio Fiber सेवा वापरू शकत नाहीत. दरम्यान, तासभरातच जिओ नेटवर्क पुन्हा सुरू झाले असून, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
हे ही वाचा:
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.