अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे यांनी उपस्थित रहावं, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली होती, त्यांचा मान राखून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सॅन होजेला गेले आणि यावेळी एक प्रकट मुलाखतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे व्यक्त झाले. २८ जून २०२४ ला अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. बऱ्याच काळाने महाराष्ट्राबाहेर पसरलेल्या मराठी जनांना भेटण्याचा योग या निमित्ताने आला असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. या निमित्ताने अनेकांशी संवाद करून महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन समजून घेता आल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.
मुलाखतीच्या निमित्ताने मुलाखतकारांनी अनेक प्रश्न विचारले, प्रेक्षागृहातील उपस्थित प्रेक्षकांच्या मनातल्या काही प्रश्नांना उत्तरं देता आली. यातून त्यांना मी एकूणच राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा विषयांकडे कसं बघतो, हे त्यांना कदाचित पुन्हा एकदा नव्याने समजलं असेल. पण माझ्या तिथे जमलेल्या मराठी जनांकडून पण काय अपेक्षा आहेत, हे देखील मी प्रांजळपणे मुलाखती दरम्यान मांडलं, असे राज ठाकरे यांनी समाजमाध्यमाद्वारे स्पष्ट केले.
आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर मराठी माणसं भारताबाहेर आहेत, तिथे त्यांनी त्यांचं एक जग उभं केलं, ते तिथे यशस्वी झालेत, या सगळ्या प्रवासात त्यांनी जो अनुभव गोळा केला असेल, जगातील उत्तम कल्पना पाहिल्या असतील, त्या त्यांना महाराष्ट्रात आणाव्यात असं वाटत असेल, तर त्या त्यांनी आणण्यासाठी पूर्ण शर्थीने प्रयत्न करावेत, आणि हे करताना महाराष्ट्रात त्यांनी या राज ठाकरेला गृहीत धरलंत तरी चालेल असं आवर्जून सांगितलं असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. बाकी आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. यासाठी, तो महाराष्ट्रात राहणारा मराठी माणूस असेल की, महाराष्ट्राबाहेर राहणारा मराठी माणूस असेल त्याला जोडणारा एक दुवा म्हणजे मराठी भाषा. ही भाषा त्याने कधीही विसरता कामा नये, जिथे २ मराठी माणसं एकत्र येतील तिथे त्यांनी एकमेकांशी मराठीतच बोललं पाहिजे, यातून जातीच्या भिंती निघून जातील आणि ‘मराठी’ म्हणून आपला एकसंध समाज उभा राहील. यासाठी तिथे जमलेल्या प्रत्येक मराठी माणसाने पण प्रयत्न केले पाहिजे, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत सांगितलं.
हे ही वाचा:
“पांडुरंगाच्या वारकऱ्यांना” मिळणार अर्थसंकल्पातून महत्त्वाच्या तरतूदी Zika Virus चा पुण्यात शिरकाव, काय आहेत लक्षणे?