भाद्रपद महिन्यात शुक्ल सष्टमीला अनुराधा नक्षरात ज्येष्ठा गौरी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होत असतं. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गौरीला पार्वतीचे शक्तीरूप मानले जाते आणि पार्वती ही बाप्पाची आई आहे. तर काही ठिकाणी गौराईना बाप्पाची बहीण मानले जाते. भावा सोबत बहीण माहेरी आली असे समजले जाते. माहेरच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे दुसरे सुख नाही त्यामुळे माहेरपण अनुभवायला बाप्पा बहिणीला घेऊन येतो असेही म्हटले जाते. दोन गौराई असतात. एक असते जेष्ठा तर दुसरी कनिष्ठ. तीन दिवस माहेरपणाला आलेल्या या गौरी घरात प्रसन्नतेचे वातावरण घेऊन येतात. पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा दुसरा दिवस त्यांच्या पुजनाचा व पाहुणचाराचा आणि तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असे एकुण तीन दिवस त्यांचे वास्तव्य घराघरात असते. अनुराधा नक्षत्रावर त्यांची स्थापना केली जाते ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचे पुजन आणि मुळ नक्षत्रावर त्यांचे विसर्जन करण्यात येते. गौरींच्या आगमनापासुन तर विसर्जनापर्यंत सारं निराळच असतं. चैतन्यानं भारलेलं वातावरण असतं. तीचे आगमन होतांना “कोण आलं? ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली सोन्याची पावलं घेऊन घरा आली” असं म्हणण्याची परंपरा आहे.