‘आमी जे तोमार..’, ‘मोंजोलिका’ म्हटलं की ‘भुलभुलैय्या’ या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. 2007 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि त्यात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका होत्या. त्यानंतर 2022 मध्ये ‘भुलभुलैय्या 2’ हा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अक्षय कुमारची जागा अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली होती. कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी आणि तब्बू या तिघांच्या यात मुख्य भूमिका होत्या. आता ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका पहायला मिळत आहेत. अनीस बाझमीने या तिसऱ्या भागाचं दिग्दर्शन केलं आहे. 2007 नंतर विद्या पुन्हा एकदा या चित्रपटात मोंजोलिकाची भूमिका साकारून प्रेक्षकांची घाबरगुंडी उडवणार असल्याचं ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहून दिसतंय.